नवी दिल्ली : आयसीसी टी20 वर्ल्ड कपमध्ये आज भारत आणि बांगलादेश यांच्यात सामना होणार आहे. दोन्ही संघासाठी हा सामना खूप महत्वाचा आहे. जर या सामन्यात भारताने बांगलादेश विरुद्ध विजय मिळवला तर भारत सेमीफायनलमध्ये पोहोचू शकतो. मात्र टीम इंडियाला बांगलादेशला हलक्यात घेणे महागात पडू शकते. बांगलादेशचा संघ मोठ्या संघांना दणका देण्यासाठी ओळखला जातो. यापूर्वीदेखील महत्वाच्या सामन्यात बांगलादेशने अनेकवेळा भारताचा पराभव केला आहे. या संघात असे खेळाडू आहेत जे भारतासाठी डोकेदुखी ठरू शकतात. चला तर मग त्या खेळाडूंबद्दल जाणून घेऊया…
१) शाकिब अल हसन
सध्याच्या काळातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक असलेला शकीब अल हसन भारतासाठी सर्वात धोकादायक आहे. आपल्या फलंदाजी आणि गोलंदाजीने सामन्याचा निकाल बदलण्याची ताकद त्याच्याकडे आहे. शाकिबकडे भरपूर अनुभव आहे तसेच त्याची फिरकी गोलंदाजी भारतासाठी धोकादायक ठरू शकते.
२) मुस्तफिजुर रहमान
डाव्या हाताच्या वेगवान गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाज अनेकवेळा डगमगताना दिसतात. रोहित शर्मा हा अफगाणिस्तानविरुद्ध डावखुरा वेगवान गोलंदाज फजलहक फारुकीचा बळी ठरला. रहमान हा उत्कृष्ट गोलंदाज आहे. त्याच्याकडे स्विंग आणि सीम दोन्ही आहेत. भारताच्या टॉप ऑर्डरसाठी तो सर्वात धोकादायक आहे. त्यामुळे भारतीय फलंदाजांना सावधपणे याचा सामना करावा लागणार आहे.
३) तंजीम हसन साकिब
तंजीम हसन साकिबही भारतासाठी अडचणीचे कारण बनू शकतो. हा गोलंदाज सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. सध्याच्या विश्वचषकात शाकिबने ५ सामन्यांत ९ विकेट्स घेतल्या असून सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या खेळाडूंमध्ये तो टॉप १० मध्ये आहे.
४) लिटन दास
बांगलादेशच्या फलंदाजीचा प्रमुख मानला जाणारा यष्टिरक्षक-फलंदाज लिटन दासकडेही भरपूर अनुभव आहे. त्याचा अनुभव संघाला उपयोगी पडू शकतो. लिटन दास हा उत्कृष्ट फलंदाज असून मोठ्या सामन्यांमध्ये धावा कशा करायच्या हे त्याला माहीत आहे. त्यामुळे त्याची लवकरात लवकर विकेट घेण्याचा भारतीय संघाला प्रयत्न करावा लागेल. जेवढा तो अधिक वेळ क्रीझवर राहील तेवढा तो भारतासाठी धोकादायक असेल.
५) तस्किन अहमद
बांगलादेश संघाचा उपकर्णधार तस्किन अहमददेखील भारताला अडचणीत आणू शकतो.भारतीय संघालाही या वेगवान गोलंदाजापासून सुरक्षित राहण्याची गरज आहे. तस्किनने यापूर्वीही भारताला अडचणीत आणले आहे. तस्किनने या विश्वचषकात ५ सामन्यांत ७ विकेट घेतल्या आहेत.