T20 World Cup 2024 (Super 8, IND vs BAN) : आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक 2024 च्या सुपर-8 फेरीत भारताने विजयाने सुरुवात केली. बार्बाडोसमध्ये झालेल्या सामन्यात टीम इंडियाने अफगाणिस्तानचा 47 धावांनी पराभव केला. आता ग्रुप-1 मधील भारताचा दुसरा सामना बांगलादेशशी आज (22 जून, रात्री 8.00 वा.) होणार आहे. या स्पर्धेत भारताचा आतापर्यंत पराभव झालेला नाही. बांगलादेशविरूध्दचा विजय भारताचे उपांत्य फेरीतील स्थान निश्चित करू शकते. त्याचवेळी दुसरीकडे सुपर-8 फेरीत बांगलादेशची मात्र पराभवाने सुरुवात झाली. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने डकवर्थ लुईस (DLS) नियमांनुसार त्यांचा 28 धावांनी पराभव केला. त्यामुळे बांगलादेशसाठी हा सामना ‘करो या मरो’ सारखा आहे. बांगलादेशने हा सामना गमावल्यास विश्वचषक स्पर्धेतील त्यांचा प्रवास संपुष्टात येऊ शकतो. अशा स्थितीत दोन्ही संघांमधील स्पर्धा चुरशीची होण्याची अपेक्षा आहे.
भारतीय संघाची ताकद पाहता ते बांगलादेशवर मात करतील असे म्हणता येईल पण टी-20 किंवा एकदिवसीय क्रिकेटच्या शेवटच्या काही सामन्यांकडे लक्ष दिले तर हे या संघाने भारतीय संघाला प्रत्येक वेळी खडतर स्पर्धा दिली आहे. त्यामुळे सुपर-8 सामन्यात बांगलादेशला कमी लेखण्याची चूक भारतीय संघ करणार नाही.
दोन्ही देशांमधील वैर सर्वश्रुत आहे. मात्र, टी-20 मध्ये कायम भारताचा वरचष्मा राहिला आहे. दोन्ही देशांदरम्यान आतापर्यंत झालेल्या 13 सामन्यांपैकी भारताने 12 सामने जिंकले आहेत. पण, बांगलादेशमध्ये उलटफेर करण्याची ताकद आहे आणि रोहित शर्माच्या टीम इंडियाला हे माहीत आहे.
विराट,रोहितसह दुबेवर असेल दबाब…
अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर भारताला अवघ्या एका दिवसानंतर बांगलादेशचा सामना करावा लागत आहे. आतापर्यंत अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू न शकलेल्या खेळाडूंनी अधिक चांगला खेळ करावा, अशी टीम इंडियाची अपेक्षा असेल. या यादीत रोहित शर्मा आणि विराट कोहली पहिल्या क्रमांकावर असतील. या दोघांनीही स्पर्धेत अनेक वेळा चांगली सुरुवात केली, पण त्याचे मोठ्या डावात रूपांतर करू शकले नाहीत. या दोघांनी सतत मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला पण प्रत्येक वेळी अपयश आले.
शिवम दुबेवरही दबाव असेल. मधल्या आणि डेथ ओव्हर्समध्ये तो षटकार मारू शकतो म्हणून त्याची वर्ल्ड कप संघात निवड झाली. पण, ज्या आयपीएलच्या फॉर्ममुळे त्याला टी-20 विश्वचषक संघाचे तिकीट मिळाले, तसा खेळ तो अद्याप करू शकलेला नाही. अमेरिकेविरुद्ध त्याने अवघड विकेटवर नक्कीच 31 धावा केल्या होत्या. पण, त्या सामन्यातील सूर्यकुमार यादवच्या कामगिरीने खरा फरक पडला. यावेळी तो अपयशी ठरला तर शिवमला डच्चू मिळणं निश्चित असून शिवम गोलंदाजीही करत नसल्याने त्याच्या जागी संजू सॅमसन खेळू शकतो. अशा स्थितीत त्याला फक्त फलंदाज म्हणून स्थान नाही.
सराव सामन्याची पुनरावृत्तीची अपेक्षा…
तसे, या टी-20 विश्वचषकात भारत आणि बांगलादेश यांच्यात सराव सामन्यातही सामना झाला आणि त्या सामन्यात भारताने बांगलादेशचा एकतर्फी पराभव केला. अशा परिस्थितीत सुपर-8 सामन्यातही भारताकडून याच कामगिरीची पुनरावृत्ती होण्याची अपेक्षा असेल.
T20 World Cup 2024 (Super 8) : बांगलादेशविरूध्द पॅट कमिन्सच्या नावे झाली ‘ब्रोकन हॅटट्रिक’ची नोंद….
बांगलादेशपुढे बुमराहचे आव्हान…
दुसरीकडे, संपूर्ण स्पर्धेत आपल्या फलंदाजीने झुंजणाऱ्या बांगलादेशला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर विजयाची नितांत गरज आहे. पॉवर हिटर्सचा अभाव त्यांना त्रासदायक ठरत आहे आणि या समस्येवर त्वरित दुसरा पर्याय नाही. लिटन दास आणि तनजीद खान या सलामीवीरांच्या खराब कामगिरीनेही बांगलादेशच्या अडचणी वाढल्या आहेत. शांतो (41) आणि तौहीद हृदय (40) या दोघांनीही आॅस्ट्रेलियाविरूध्द चांगली कामगिरी केली, पण बाकीचे फलंदाज अपयशी ठरले. त्यांना बुमराहला सामोरे जाण्याचा मार्ग शोधावा लागेल, ज्याने आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे आणि प्रति षटक 3.46 धावांच्या अतुलनीय इकॉनॉमी रेटने 8 बळी घेतले आहेत. मुस्तफिझूर रहमानच्या नेतृत्वाखालील वेगवान गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे, पण लेगस्पिनर रिशाद हुसेनला फिरकी विभागात अधिक पाठबळाची गरज आहे.
पिच रिपोर्ट : अँटिग्वामधील सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमची खेळपट्टी फलंदाज आणि गोलंदाज दोघांनाही सारखीच मदत करते. वेगवान गोलंदाजांना सुरुवातीला मदत नक्कीच मिळते, पण एकदा फलंदाज स्थिरावले की ते चांगल्या धावा करू शकतात. खेळपट्टीवर फिरकीपटूही महत्त्वाची भूमिका बजावतात. खेळपट्टीवर चांगली उसळी दिसू शकते. अँटिग्वामध्ये एकूण 35 टी-20 सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 16 वेळा विजय मिळवला आहे, तर दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाने 17 वेळा विजय मिळवला आहे.
वेदर रिपोर्ट : अँटिग्वा येथे भारत-बांगलादेश सामना स्थानिक वेळेनुसार सकाळी 10.30 वाजता तर भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 8.00 वाजता खेळवला जाईल. हवामानाच्या अंदाजानुसार, सामन्याच्या दिवशी पावसाची 23 टक्के शक्यता आहे. अशा परिस्थितीत पावसामुळे सामन्यात व्यत्यय येऊ शकतो.