T20 World Cup 2024 (Super 8, IND vs BAN, Playing XI Update) : आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक 2024 च्या सुपर-8 फेरीत भारताने विजयाने सुरुवात केली. बार्बाडोसमध्ये झालेल्या सामन्यात टीम इंडियाने अफगाणिस्तानचा 47 धावांनी पराभव केला. आता ग्रुप-1 मधील भारताचा दुसरा सामना बांगलादेशशी आज (22 जून, रात्री 8.00 वा.) होणार आहे.
तत्पूर्वी, बांगलादेशचा कर्णधार नझमुल हुसेन शांतो याने भारताविरुद्धच्या सुपर एट टप्प्यातील सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय कर्णधार रोहित शर्माने या सामन्यासाठी प्लेइंग-11 मध्ये कोणताही बदल केलेला नाही. तर बांगलादेशसाठी तस्किन अहमद या सामन्यातून बाहेर आहे.
IND vs BAN : दोन्ही संघांची Playing 11 खालीलप्रमाणे….
बांगलादेश : तनझिद हसन, लिटन दास (यष्टीरक्षक), नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तौहीद हरदोय, शकीब अल हसन, महमुदुल्ला, झाकीर अली, रशीद हुसेन, मेहदी हसन, तनझिम हसन शकीब, मुस्तफिजुर रहमान.
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह.
दोन्ही देशांमधील वैर सर्वश्रुत आहे. मात्र, टी-20 मध्ये कायम भारताचा वरचष्मा राहिला आहे. दोन्ही देशांदरम्यान आतापर्यंत झालेल्या 13 सामन्यांपैकी भारताने 12 सामने जिंकले आहेत. पण, बांगलादेशमध्ये उलटफेर करण्याची ताकद आहे आणि रोहित शर्माच्या टीम इंडियाला हे माहीत असल्यानं त्यांना कमी लेखण्याची चूक भारतीय संघ करणार नाही.
या स्पर्धेत भारताचा आतापर्यंत पराभव झालेला नाही. बांगलादेशविरूध्दचा विजय भारताचे उपांत्य फेरीतील स्थान निश्चित करू शकते. त्याचवेळी दुसरीकडे सुपर-8 फेरीत बांगलादेशची मात्र पराभवाने सुरुवात झाली. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने डकवर्थ लुईस (DLS) नियमांनुसार त्यांचा 28 धावांनी पराभव केला. त्यामुळे बांगलादेशसाठी हा सामना ‘करो या मरो’ सारखा आहे. बांगलादेशने हा सामना गमावल्यास विश्वचषक स्पर्धेतील त्यांचा प्रवास संपुष्टात येऊ शकतो. अशा स्थितीत दोन्ही संघांमधील स्पर्धा चुरशीची होण्याची अपेक्षा आहे.
पिच रिपोर्ट (खेळपट्टी) बदल बोलायचे झाले तर अँटिग्वामधील सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमची खेळपट्टी फलंदाज आणि गोलंदाज दोघांनाही सारखीच मदत करते. वेगवान गोलंदाजांना सुरुवातीला मदत नक्कीच मिळते, पण एकदा फलंदाज स्थिरावले की ते चांगल्या धावा करू शकतात. खेळपट्टीवर फिरकीपटूही महत्त्वाची भूमिका बजावतात. खेळपट्टीवर चांगली उसळी दिसू शकते. अँटिग्वामध्ये एकूण 35 टी-20 सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 16 वेळा विजय मिळवला आहे, तर दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाने 17 वेळा विजय मिळवला आहे.