वाघोली, {प्रभात प्रभाव}- वाडेबोल्हाई ग्रामपंचायतीकडून अनधिकृत वापरत असलेले पथदिवे दोन दिवसात बंद करावेत आणि रीतसर पहिले स्ट्रीट लाइट मीटर घ्यावे, अन्यथा अनधिकृत वीज वापर चालू आढळल्यास ग्रामपंचायतीवर भा. वि. कायदा कलम 135 अंतर्गत वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे पत्र महावितरण चे सहाय्यक अभियंता यांनी सरपंच/ ग्रामसेवक यांना काढले आहे.
दैनिक प्रभातने वाडे बोल्हाई ग्रामपंचायतीकडून अनधिकृत पथदिवे सुरू करून गेल्या तीन महिन्यापासून केलेल्या वीजचोरी बाबतच्या प्रश्नाला वाचा फोडली होती. ग्रामपंचायत वाडेबोल्हाई हद्दीत बर्याच ठिकाणी पोलवर परस्पर पथदिवे लावलेले दिसत आहेत.
त्यासाठी आपण स्ट्रीट लाइट मीटर घेणे आवश्यक आहे; परंतु आपण तसे न करता अनधिकृतपणे स्ट्रीटलाइट वापरत आहे, असे निदर्शनास आलेले आहे.
त्यामुळे वापरलेले विजेचे मापन कुठेही होताना दिसत नाही. त्यामुळे एकूणच महावितरण कंपनीने आर्थिक नुकसान होत आहे. असे महावितरणकडून पत्राद्वारे ग्रामपंचायतीला कळवण्यात आले आहे. महावितरण कंपनी अॅक्शन मोडमध्ये आली असून वाडेबोल्हाई ग्रामपंचायतकडून अनधिकृतपणे पथदिवे सुरू असल्यास कारवाईचा इशारा महावितरण दिल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.