मुंबई – मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातील निकालावरून सध्या वाद सुरू आहेत. त्यातच शिंदे गटाचे खासदार रविंद्र वायकर यांनी मंगळवारी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली.
यावेळी रवींद्र वायकर यांनी माध्यमांशी संवाद साधत मतमोजणीदरम्यान एक लाख मतांची मोजणी बाकी असताना विजयी कुणी घोषित केले?, असा सवाल उपस्थित केला. तसेच त्यांनी यावेळी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावरही पलटवार केला आहे.
वायकर हे दगाबाजी करून निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांनी नैतिकतेच्या आधारे खासदारकीची शपथ घेऊ नये, असे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हंटले होते.
यावर बोलतांना वायकर म्हणाले, खासदारकीची शपथ म्हणजे ही काही आईची शपथ, वडिलांची शपथ, देवाची शपथ नाही. त्यांनी मोठेपणाने पराभव पचवायला शिकले पाहिजे. मला टार्गेट केले जात आहे. माझ्या विरोधात नकारात्मकता पसरवण्यात आली आहे, असा आरोप त्यांनी केला.
ठाकरेंसोबत सदिच्छा भेट !
राज ठाकरेंसोबतची भेट ही सदिच्छा भेट होती असे, वायकरांनी स्पष्ट केले. राज ठाकरेंचे सहकार्य लाभले, त्याबाबत भेट घेणे महत्वाचे होते, असेही ते म्हणाले. तसेच भाजपने 400 पारचा नारा दिला. त्यांच्या तेवढ्या जागा आल्या नाही.
आरोप करणाऱ्यांनी कोर्टात जावे पुरावा सादर करावा. मोबाइल हा प्रत्येकाकडे असतो. मोबाइल टॉवर चेक केले तर मतदान केंद्रात त्या दिवशी किती लोकांकडे मोबाइल होते हे कळेल. पण ते हॅक केले जाते हे सिद्ध झाले तर त्यातून खूप मोठं काही कळू शकते, असेही वायकर म्हणाले.