मुंबई : व्यक्ती येतात जातात, सत्ता जाते येते पण महाराष्ट्र कायमच राहणार आहेना, मग तुम्ही त्या महाराष्ट्राबद्दल विचार केला पाहिजे. सध्या महाराष्ट्र जाती-पातीत अडकला असला तरी हा महाराष्ट्र यातून निश्चितपणे बाहेर निघेल आणि महाराष्ट्राला मी यातून बाहेर काढेन, असा विश्वास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केला. अमेरिकेत सॅन होजेला बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळाचे अधिवेशन सुरु आहे. या वर्षीच्या अधिवेशनाला राज ठाकरे यांनी भेट दिली. यावेळी अभिनेते आनंद इंगळे आणि ज्येष्ठ पत्रकार अपर्णा वेलणकर यांनी राज ठाकरे यांची मुलाखत घेतली. यावेळी राज यांनी मराठी भाषा, महाराष्ट्र यावर भरभरून मत व्यक्त केली.
राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रात राहणारा मराठी माणूस असेल की महाराष्ट्राबाहेर राहणारा मराठी माणूस असेल त्याला जोडणारा एक दुवा म्हणजे मराठी भाषा आहे. ही भाषा त्याने कधीही विसरता कामा नये, जिथे 2 मराठी माणसं एकत्र येतील तिथे त्यांनी एकमेकांशी मराठीतच बोलले पाहिजे. यातून जातीच्या भिंती निघून जातील आणि मराठी म्हणून आपला एकसंध समाज उभा राहील. यासाठी तिथे जमलेल्या प्रत्येक मराठी माणसाने प्रयत्न केले पाहिजेत, असेही राज म्हणाले.
शर्मिलाच्या बाबांना पाहिले अन् पळालो
लग्नाच्या आधी एका 31 डिसेंबरला मी आणि शर्मिला, आम्ही एका ठिकाणी फिरायला गेलो होतो. तेव्हा शर्मिला आणि माझ्या प्रेम संबंधांबाबत माझ्या सासऱ्यांना म्हणजे मोहन वाघ यांना माहिती नव्हते. रात्री अडीच तीनच्या सुमारास मी शर्मिला यांना त्यांच्या घरी सोडायला गेलो. तेव्हा फाटकाजवळ कुणीतरी फिरताना दिसले, तेव्हा तिने मला तिथे बाबा आहेत, असे सांगितले. ती 31 डिसेंबरची पहाट होती. त्यावर मी तिला सांगितले की तिथे बाबा नाही तर वॉचमन आहेत, पण ते शर्मिला यांचे बाबा होते, तेव्हा घाबरून तिथून पळ काढला, हा आयुष्यातला एकमेव प्रसंग होता, जेव्हा मी पळून गेलो होतो, असे राज यांनी सांगताच उपस्थितांमध्ये जोरदार हशा पिकला.