आळंदी, {एम. डी. पाखरे/ज्ञानेश्वर फड}-
अवघाचि संसार सुखाचा करीन।
आनंदे भरीन तिन्हीं लोक॥
जाईन गे माय तया पंढरपुरा।
भेटेन माहेरा आपुलिया॥
सर्व सुकृताचें फळ मी लाहीन।
क्षेम मीं देईन पांडुरंगी॥
बापरखुमादेवीवरु विठ्ठलेंसी भेटी।
आपुले संवसाटी करुनि ठेला॥
ज्ञानोबा.. तुकाराम…श्री ज्ञानदेव… श्री तुकाराम या अखंड नामघोषात, टाळ मृदंगाच्या गजरात भक्तीमय वातावरणात श्री ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळ्याने पंढरीकडे प्रस्थान ठेवले. सकाळी 9 ते 11 वीणा मंडपात कीर्तन झाले. दुपारी 2 पासून मानाच्या 56 दिंडीला क्रमाने मंदिरात प्रवेश देण्यात आला. सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास माऊलींच्या अश्वांचे मंदिरात आगमन झाले. साडेसहा वाजता आरती होऊन 7.10च्या सुमारास पालखीचे वीणा मंडपातून प्रस्थान झाले.
यादरम्यान देऊळवाड्यात ज्ञानोबा तुकाराम असा अखंड जयघोष सुरु होता. त्यानंतर मंदिर प्रदक्षिणा करून पालखी महाद्वारातून बाहेर आली. प्रदक्षिणा मार्गाने भराव रस्ता-भैरवनाथ महाराज चौक-हजेरी मारुती-चावडी चौक-महाद्वार चौकातून येत माऊलींचे आजोळघर दर्शन मंडप इमारत (गांधीवाडा ) येथे मुक्कामास पोहोचली.
नंतर समाज आरती, जागराचा कार्यक्रम झाला. रविवारी (दि. 30) सकाळी 6 वाजता पालखी सोहळा पुणे मुक्कामाकडे मार्गस्थ होणार आहे. प्रस्थान सोहळ्यासाठी चार ते पाच लाख भाविक आळंदीत दाखल झाले होते.
देऊळवाड्यात वारकर्यांचे लक्षवेधी खेळ
माउलींच्या पालखी प्रस्थानासाठी दुपारी दोन वाजतापासून दिंडीना देऊळवाड्यात प्रवेश देण्यात आला. यावेळी मंदिरात येताच वारकर्यांमध्ये उत्साह दिसून येते होता. ज्ञानोबा…. तुकाराम… असा मोठ मोठ्या आवाजात वारकरी जयघोष करत होते.
यावेळी ते विविध खेळ मोठ्या उत्साहाने खेळत होते. फुगडी, वारकरी एकमेकांवर उभे राहून दोन तीन थर चढवून पखवाज वाजवणे, पताका फडकवणे, दिंडी क्रमांकाची पाटी फिरवत होते. तसेच खाली झोपून गोल फिरत होते. पायाचे अंगठे धरून पाठीवर गोल गिरक्या घेणे, टाळ वाजवत उंच उडी घेणे असे विविध खेळ वारकरी खेळत होते. यांचे हे खेळ उपस्थित सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
मंदिरास आकर्षक फुलांची सजावट –
माऊली मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. संपूर्ण देऊळवाडा परिसरात मोगरा, गुलाब अश्या सुगंधी फुलांची आरास करण्यात आली होती. महाद्वार, मंदिरातील सर्व भागाला फुलांचे तोरण, तसेच शिखराला देखील आकर्षक सजावट करण्यात आली होती.
गणेश मंदिरासमोर पानांमध्ये श्री विठ्ठल रखुमाईची मुर्ती सकरण्यात आली होती. फुलांचा गंध संपूर्ण देऊळवाडा परिसरात दरवळला होता.
इंद्रायणी घाटावर दिंड्याच्या प्रदक्षिणा –
माऊलींच्या पालखी सोहळ्यात 400 हुन अधिक दिंडी आहेत. देऊळवाड्यात केवळ 56 दिंडीला प्रवेश देण्यात येतो. इतर काही दिंड्या प्रस्थान सोहळ्याआधी सकाळीच मंदिर प्रदक्षिणा घालत होत्या. तर अनेक दिंड्या या नगर प्रदक्षिणा घालून इंद्रायणी घाटावर येत होत्या.
यावेळी वारकरी इंद्रायणी घाटावर महिला पुरुष, लहाना पासून वयोव्रद्ध वारकरी फुगडी खेळण्याचा आनंद घेत होते. डोक्यावर तुळस घेतलेल्या महिला, गळ्यात वीणा घेतलेली विणेकरी, हातात भगवी वारकरी पताका घेतलेले वारकरी, टाळकरी, मृदंगवादक असे दिंडीचे स्वरूप असलेल्या दिंड्या दिवसभर इंद्रायणी घाटवर येत होत्या.
घाटावर 24 तास भाविकांची लगबग –
इंद्रायणी घाट परिसर दिवसभर तसेच रात्रीच्या वेळीही भाविकांनी गजबजलेला आहे. अनेक वारकर्यांचा मुक्काम हा इंद्रायणी घाटावर आहे. रात्रीच्यावेळी विश्व शांती केंद्र येथे इंद्रायणीच्या पलीकडील घाटावर भजन, कीर्तन असे विविध कार्यक्रम सुरु आहेत. भाविक या भक्तिमय वातावरण तल्लीन होत आहेत.
आळंदी पंचक्रोशीत हरीनामाचा गजर –
गेल्या काही वर्षात आळंदीसह आजूबाजूचा परिसराचा विस्तार झाला आहे. पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी आलेले भाविक वारकरी पंचक्रोशीत मुक्कामास आहेत. त्यामुळे भजन, कीर्तनाने संपूर्ण परिसर भक्तीमय झाला आहे.
जिकडे तिकडे चोहीकडे हरीनामाचा अखंड गजर सूरू आहे. आळंदीतील सर्वच रस्ते दिवसभर वारकर्यांनी गच्च भरले आहेत. प्रामुख्याने प्रदक्षिणा मार्गावर दिवअभर अलोट गर्दी होती.