आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी लोकसभा निवडणुकीबाबत मोठा दावा केला आहे. बांगलादेशी वंशाच्या अल्पसंख्याक समुदायावर त्यांनी निशाणा साधला आहे. सरमा म्हणाले की, ‘या समाजातील लोकांना घर, शौचालय, रस्ते, सरकारी नोकऱ्या, रेशन आणि दरमहा १२५० रुपये मोदी सरकारकडून मिळाले पण या समाजाने काँग्रेसला मतदान केले कारण त्यांना तुष्टीकरण हवे होते.’
शनिवारी गुवाहाटी येथे एका कार्यक्रमादरम्यान सरमा पुढे म्हणाले,’त्यांचा उद्देश विकास नसून मोदींना हटवून त्यांच्या समाजावर वर्चस्व टिकवून ठेवण्याचे आहे. आसाममधील हा एकमेव समुदाय आहे जो जातीयवादात गुंतला आहे. यावरून हिंदू जातीयवादात गुंतलेले नाहीत हे सिद्ध होते. आसाममध्ये जर कोणी जातीयवाद करत असेल तर तो एकच समुदाय आहे.’
त्यांनी यावेळी आसाममधील विजायायचे गणितही समजवून सांगितले,’आसाममध्ये एनडीएने 14 पैकी 11 जागा जिंकल्या तर काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांना फक्त तीन जागा मिळाल्या. जर आपण मतांच्या टक्केवारीबद्दल बोललो तर एनडीएला 47 टक्के मते मिळाली तर इंडिया आघाडीला 39 टक्के मते मिळाली.’
सीएम सरमा म्हणाले की,’ जर आपण काँग्रेसच्या 39 टक्के मतांचे विश्लेषण केले तर ते संपूर्ण राज्यातून मिळालेले नाही. यातील 50 टक्के मतदान अल्पसंख्याक बहुल असलेल्या 21 विधानसभा मतदारसंघातून मिळाले आहे. या भागात भाजपला तीन टक्के मते मिळाली.