देहूगाव, (वार्ताहर) – जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा म्हणजेच आषाढी वारी अगदी तोंडावर आली असताना इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाकडे शासन गांभीर्याने पाहात नाही. त्यामुळे देहूत नदीपात्रातील जलपर्णीची दिवसेंदिवस वाढ होत आहे. प्रदूषित पाणी पवित्र तीर्थ म्हणून सेवन करणाऱ्या वारकऱ्यांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे.
जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आषाढी वारीसाठी येत्या २८ जूनला देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. या पार्श्वभूमीवर, देऊळवाडा आणि वकुंठस्थान जवळील इंद्रायणीचे पात्र स्वच्छ कधी होणार ? अशी विचारणा स्थानिक नागरिक आणि भाविक करत आहेत.
देहू ग्रामपंचायतीने योग्य असे नियोजन करून इंद्रायणीच्या पात्रात जलपर्णी वाढू दिली नव्हती. त्यावेळी संत तुकाराम महाराज देऊळवाडा आणि वैकुंठस्थानाजवळील इंद्रायणीचे पात्र स्वच्छ होते. तसेच या भागात नौकानयनही सुरु होते.
मात्र, गेल्या दोन वर्षांपासून देहूतील संत तुकाराम महाराज देऊळवाडा आणि वैकुंठस्थानाजवळील नदीपात्रात जलपर्णी सतत वाढत आहे. भाविकांची गैरसोय होत आहे. इंद्रायणी नदीचे पाणी पवित्र तीर्थ म्हणून सेवन करण्याची वारकऱ्यांमध्ये प्रथा आहे. मात्र, इंद्रायणीचे पाणी दूषित असल्याने वारकऱ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.