मुंबई : शिवसेनेला येत्या विधानसभेच्या निवडणुकीत 100 जागा हव्या. सध्या आमच्याकडे 50 आमदार आहेत. गेल्या वेळी आम्ही 100 पेक्षा जास्त जागा लढवल्या होत्या. त्यामुळे आता आम्हाला 100 जागा हव्यात. त्या दिल्या नाहीत तर सगळ्या जागा आमच्याच, असा थेट इशारा शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी भाजपला दिला आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. या मुलाखतीत त्यांनी लोकसभा निवडणूकीत झालेल्या पराभवावर महायुतीतील मित्रपक्षांना आत्मपरिक्षण करण्याचाही सल्ला दिला. रामदास कदम म्हणाले, अजित पवारांना जरा उशिरा घेतले असते तर त्यांच्या वाट्याला गेलेली 9 मंत्रिपदे शिवसेनेला मिळाली असती आणि मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेल्यांना जॅकेट घालून बसावे लागले नसते. तसेच सर्व्हेच्या नावाखाली आमचे उमेदवार बदलले, पण भाजपचेही उमेदवार पडलेच की, त्यामुळे सर्व्हे फक्त शिवसेनेचे उमेदवार बदलण्यासाठीच होते की काय असा सवालही त्यांनी विचारला.
उद्धव ठाकरेंनी लोकसभेच्या 21 जागा लढवल्या, मग आम्हाला कमी का मिळाल्या. आम्हाला जास्त जागा मिळाल्या असत्या तर आणखी खासदार निवडून आले असते. तुलाही नाही आणि मलाही नाही असं व्हायला नको. शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्हाला सत्ता आणायची आहे. यासाठी महायुतीचा लोकसभेत पराभव का झाला याचे विश्लेषण तीनही पक्षांनी करावे, असेही रामदास कदम म्हणाले.