सातारा, (प्रतिनिधी) – माजी ठेकेदार आणि विद्यमान ठेकेदार यांच्यात घंटागाडीच्या देखभालीवरून जुंपली असून सध्याच्या ठेकेदाराने पूर्वीच्या ठेकेदाराची अनामत जप्त करण्यात यावी अशी मागणी केल्याची चर्चा आहे . चाळीस घंटा गाड्यांची टप्प्याटप्प्याने दुरुस्ती सुरू झाल्याने सध्या सातारा शहरांमध्ये कचरा संकलनाची अडचण झाली आहे.
आरोग्य विभागाचा उपाय म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर असे म्हणण्याची वेळ आली आहे. सातारा पालिकेच्या आरोग्य विभागाचे सार्वजनिक स्वच्छतेचे धोरण हे सर्वसामान्यांच्या आकलनापलीकडचे आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये भगवते एंटरप्राइजेस या ठेकेदाराला साताऱ्याच्या स्वच्छतेचा ठेका देण्यात आला होता . त्यावेळी सुद्धा गाड्यांची अवस्था भंगार झाल्याचा अहवाल संबंधित ठेकेदाराने दिला होता.
आता कचरा संकलन हे सदर बाजार येथील ठेका कंपनीला देण्यात आले आहे. कायझेन या प्रकारात मोडणाऱ्या घंटागाडी त्याचे टायर रिमोल्ड करण्याच्या स्थितीत आले असून गाड्यांचे हौदे आणि त्याची हायड्रोलिक यंत्रणा बिघडलेली आहे.
तसेच गाड्यांच्या बॅटऱ्या आणि त्याचे पाणी सुद्धा बदलण्यात न आल्याने गाड्यांच्या पिस्टनवर ताण येऊन गाडी रस्त्यातच बंद पडण्याचे प्रकार होत आहेत. सदरबझार आणि इंदिरानगर वसाहतीत दोन वेळा गाडी बंद पडण्याचा प्रकार झाला होता.
सातारा शहरामध्ये सध्या 32 गाड्या धावत असून आठ घंटागाड्या दुरुस्तीला पाठवण्यात आले आहेत. विद्यमान ठेकेदाराने गाडी योग्य नसल्याने कचरा संकलनात अडथळा होत असल्याची तक्रार केली आहे व जुन्या ठेकेदाराच्या डिपॉझिट मधून संबंधित दुरुस्तीचा खर्च करण्यात यावा अशी शिफारस केल्याची चर्चा आहे.
काही गाड्यांच्या स्टेपनी गायब असल्यामुळे माजी ठेकेदाराला 80 हजार रुपयांचा मुख्याधिकाऱ्यांनी दंड केल्याची आरोग्य विभागाने माहिती दिली. या तांत्रिक दुरुस्तीच्या घोळामध्ये रोजचा 52 टन कचऱ्यापैकी 40 टन कचरा उचलला जात आहे.
त्यामुळे बुधवार नाका चौक, राधिका रोड, लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय रामाचा गोट, खणआळी, बसप्पापेठ कॉर्नर, मार्केटयार्ड परिसर, इंदिरानगर वसाहत, तामजाईनगर ,भैरवनाथ कॉलनी इत्यादी ठिकाणी कचरा तसाच पडून राहत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
कचरा संकलन प्रक्रिया सुरळीत होईल
सात वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या घंटागाड्या या काही वर्षातच भंगारात झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. तसेच घंटागाडी कचरा संकलन प्रक्रियेत सहाय्यक गायब असणे, गाडीच्या हौद्यावर हिरवे कापड नसणे, याशिवाय गाडीवर वाजणारे गाणे बेपत्ता असणे असे प्रकार घडत असल्यामुळे नागरिकांना घंटागाडी कधी येणार हे समजत नाही.
त्यामुळे कचरा संकलनाची अडचण होत आहे. यासंदर्भात प्रकाश राठोड यांच्याशी संपर्क साधला असता सर्व चालकांना याबाबतची माहिती दिली जात असून संपूर्ण गाड्या दुरुस्त झाल्यानंतर कचरा संकलन प्रक्रिया सुरळीत होईल असा दावा त्यांनी केला.