गुवाहाटी – आसाममधील पूरस्थितीत गंभीर असून प्रमुख नद्यांच्या पाण्याच्या पातळीत सोमवारी किंचीत घट झाली. मात्र, अद्यापही दोन लाखांहून अधिक लोक महापुरात अडकले आहेत.
राज्यातील नऊ जिल्ह्यांमध्ये सध्या 2.07 लाख लोकसंख्या पुरामुळे बाधित झाली आहे. बाजाली, बारपेटा, बिस्वनाथ, कचार, दररंग, गोलपारा, कामरूप, करीमगंज आणि नलबारी हे सध्या पूरग्रस्त जिल्हे आहेत.
करीमगंजला सर्वाधिक पुराचा फटका बसला असून एक लाखांहून अधिक लोक पुरग्रस्त आहेत. यंदाच्या पूर, भूस्खलन आणि वादळात आतापर्यंत एकूण 39 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
करीमगंजमधील कुशियारा नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. गेल्या दोन दिवसांपासून पाऊस थांबल्यामुळे इतर प्रमुख नद्या आणि त्यांच्या उपनद्यांची पाणी पातळी कमी होत असल्याचे दिसून येत आहे.
बाधित जिल्ह्यांतील 200 हून अधिक मदत छावण्यांमध्ये 75,000 हून अधिक लोकांनी आश्रय घेतला आहे. सध्याच्या पुरामुळे राज्यभरात 800 हून अधिक गावे आणि 4,274.13 हेक्टर पीक क्षेत्राचे नुकसान झाले आहे. पूरग्रस्त बहुतांश जिल्ह्यांमध्ये बंधारे, रस्ते, पूल आणि इतर पायाभूत सुविधांचे पुराच्या पाण्यामुळे नुकसान झाले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सर्व बाधित जिल्ह्यांच्या प्रशासनाला सतर्क राहण्याचे आणि लोकांना आवश्यक मदत आणि पुनर्वसन करण्याचे निर्देश दिले आहेत.