Samruddhi Express Way Accident| समृद्धी महामार्गावर आतापर्यंत अनेक भीषण अपघात झाले आहेत. यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला. मागील वर्षी एका लक्झरी बसचा अपघात होऊन त्यात २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. यावरून राज्यभरातून संताप व्यक्त केला गेला. याप्रकरणी मृत्युमुखी पडलेल्या २५ प्रवाशांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाख रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तेव्हा केली होती.
६ कोटी २५ लाख रुपयांची मदत या माध्यमातून दिली जाणार होती. मात्र या घटनेला आज १ जुलै रोजी वर्ष पूर्ण होत आहे. मात्र अद्यापही सरकारकडून कोणतीही मदत मिळालेली नाही. यावरून विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी ट्वीट करत सरकारवर निशाणा साधला आहे.
विजय वडेट्टीवार यांनी ट्वीट करत ‘म्हणे, आम्ही तत्पर सरकार वर्ष उलटूनही समृद्धी महामार्गावरील अपघातग्रस्तांच्या कुटुंबीयांना २५ लाखांच्या मदतीचा विसर’असे म्हणत सरकारवर हल्लाबोल केला आहे. “समृद्धी महामार्गावर लक्झरी बस जळून मृत्युमुखी पडलेल्या २५ प्रवाशांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाख रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. ६ कोटी २५ लाख रुपयांची मदत या माध्यमातून दिली जाणार होती. पण घटनेला आज, १ जुलै रोजी वर्ष पूर्ण होत असतानाही घोषणेतील मदत मिळालेली नाही.” असे वडेट्टीवार यांनी म्हंटले आहे.
म्हणे, आम्ही तत्पर सरकार!
वर्ष उलटूनही समृद्धी महामार्गावरील अपघातग्रस्तांच्या कुटुंबीयांना २५ लाखांच्या मदतीचा विसर .
समृद्धी महामार्गावर लक्झरी बस जळून मृत्युमुखी पडलेल्या २५ प्रवाशांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाख रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली… pic.twitter.com/GEqzR8GbS5
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) July 1, 2024
यावेळी त्यांनी मृत व्यक्तींच्या कुटूंबाच्या परिस्थितीबाबत देखील सांगितले आहे. “कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा आधार हिरावले गेल्याने पीडित कुटुंबांचे वर्तमान आणि भविष्य अंधकारमय झाले आहे. तेजस्विनी राऊत ही पुण्याला नोकरी करत होती. घरातील कर्ती मुलगी गेली, भाऊ गतिमंद आहे. त्यामुळे तिच्या आईवर धुणीभांडी करण्याची वेळ आली आहे. प्रथमेश खोडे याची आई देखील निराधार जीवन जगत आहे. तेजस पोकळे हा एकुलता एक मुलगा मृत्युमुखी पडल्याने आई- वडील देखील निराधार झाले आहेत. करण बुधबावरे हा अनुकंपा तत्त्वावर टपाल विभागात नोकरीला लागला होता. त्याची आई वृद्ध असल्याने शासकीय सेवेत लागू शकत नाही. परिणामी मजुरीने काम करीत एकल जीवन जगत आहेत.”
“सुशील खेळकर हा कमावता मुलगा होता. सुशील गेल्याने आईवडिलांच्या आधाराची काठी मोडली आहे. हीच स्थिती झोया शेखच्या कुटुंबीयांचीही आहे. नागपूरचा कौस्तुभ काळे हादेखील या अपघातात दगावला. त्याचे ८० वर्षीय आईवडील बुलढाण्याला मृत्युपत्र घेण्यासाठी वारंवार चकरा मारत आहेत. अजूनही त्यांना मृत्युपत्र दिले नाही. ‘डिटेल अॅक्सिडेंटल रिपोर्ट’ (डीआर) पोलिसांनी सादर केलेला नाही. या सर्व अडचणी सरकारच्या दुर्लक्षित धोरणामुळे निर्माण झाल्याचा आरोप मृतांच्या नातेवाइकांनी केला आहे. सत्तेसाठी फोडाफोडी आणि वाटेल ते करून सरकार बनवणारे, स्वतः जाहीर केलेली मदत देऊ शकत नाही आणि म्हणे, आम्ही तत्पर सरकार,” असे म्हणत वडेट्टीवार यांनी म्हंटले आहे.
नेमकं काय घडलं होतं?
नागपूरहून ३० जून २०२३ च्या रात्री पुण्यासाठी प्रवासी घेऊन विदर्भ ट्रॅव्हल्सची बस निघाली होती. समृद्धी महामार्गावरून जात असताना बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजाजवळ पिंपळखुटा शिवारात एक जुलैच्या पहाटे दीड वाजता ही बस उलटून पेटली. बसचा डिझेल टँक फुटला आणि आगीचा भडका उडाला. यात एका चिमुकलीसह १५ महिला आणि दहा पुरुषांचे जीव गेले. तर चालक शेख दानिश शेख इस्माइलसह काही लोकांनी उड्या मारून आपला जीव वाचवला.