पिंपरी – मावळचे खासदार श्रीरंग बारणे तर शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात डेरेदाखल झाले आहेत. तेव्हापासून पिंपरी-चिंचवड शहरातील उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला गळती लागली आहे. अनेक पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या बाळासाहेबांची शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. त्यासाठी खासदार श्रीरंग बारणे यांची टीम आघाडीवर आहे. मात्र पक्ष सोडून जाणाऱ्या पदाधिकाऱ्यांना थोपविण्यात ठाकरेंच्या शिवसेनेला सध्या तरी अपयश येत असून चांगलीच दमछाक होताना दिसत आहे.
पदाधिकाऱ्यांचा उत्साह वाढविण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम, कार्यक्रम द्यावे लागतात. पडत्या काळात पक्षातील पदाधिकाऱ्यांना टिकवून ठेवण्याचे कसब पक्षनेतृत्त्वाकडे असल्यास पक्ष तरला जातो. ही वस्तुस्थिती असली तरी पिंपरीत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे पदाधिकारी पक्ष टिकवून ठेवण्यात कमी पडत असल्याचे चित्र आहे.
पक्षातील विविध आघाड्यांचे पदाधिकारी पक्षाला रामराम करून खासदार श्रीरंग बारणे यांच्या सोबत मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल होत आहेत. कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविण्यात ठाकरे सेना कमी पडत आहे.
पक्षाचा मोठा कार्यक्रम झाला नाही. राज्यातील नेते शहरात आणून कायकर्त्यांचे मनोबल वाढविणे गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्ष होत आहे. तर दुसरीकडे माजी नगरसेवक असलेले अनेक ज्येष्ठ नेते वेट अँड वॉच च्या भूमिकेत आहेत. त्याचा देखील पक्षालाच फटका बसत असल्याचे चित्र आहे. पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करून त्या जाहीर करण्याकडे उद्धव सेनेचे दुर्लक्षच होत आहे. त्याचा अधिक फटका बसत आहे.
नव्या पदाधिकाऱ्यांवर जबाबदाऱ्या
खासदार श्रीरंग बारणे यांची टीम ठाकरे गटाला शक्य होईल तिथे छोटे छोटे भगदाड पाडत आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील अनेक पदाधिकाऱ्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे आहे. ठाकरेंच्या सेनेतील मोरवाडीतील आजी माजी पदाधिकारी, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठातील विद्यार्थी आघाडी अध्यक्ष, चिखली विभागप्रमुख, बोपखेल विभागप्रमूख, पिंपळे सौदागर येथील उपविभागप्रमुख आदीसह अनेक पदाधिकारी पक्षात दाखल होत आहेत. पक्षात दाखल होणाऱ्या नव्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्याबरोबरच नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा देखील सपाटा सुरू आहे. केवळ नियुक्त्या केल्या जात नसून नव्या पदाधिकाऱ्यांवर जबाबदाऱ्याही दिल्या जात आहेत. बाळासाहेबांच्या शिवसेनेचा जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, शहरप्रमुख, युवासेनाप्रमुख आदींसह प्रभागनिहाय पदाधिकाऱ्यांची निवड केली आहे. एकंदरीतच दोन्ही गटाकडून पक्ष टिकविण्यासाठी धडपड सुरू असल्याचे दिसते. मात्र यामध्ये कोणाला किती यश मिळते, हे भविष्यात अधिक स्पष्ट होणार आहे.