अमरावती -आंध्र प्रदेशातील वायएसआर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मुद्रागडा पद्मनाभम यांनी शपथेचे पालन करत चक्क अधिकृतरित्या नाव बदलले. आता ते पद्मनाभ रेड्डी म्हणून ओळखले जातील. आंध्रचे नवे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांना हरवण्यात अपयश आल्याने रेड्डी यांनी दिलेला शब्द पाळला.
जनसेना पक्षाचे प्रमुख आणि अभिनेते असणाऱ्या कल्याण यांच्या पराभवाची विधानसभा निवडणुकीत निश्चिती करण्याची प्रतिज्ञा पद्मनाभम यांनी केली. कल्याण पराभूत झाले नाही तर नाव बदलेल, अशी शपथही त्यांनी प्रचारावेळी घेतली. मात्र, कल्याण विजयी झाले.
एवढेच नव्हे तर, उपमुख्यमंत्रीही बनले. त्यामुळे शपथेचे पालन करत पद्मनाभम यांनी रेड्डी हे नाव धारण केले. नाव बदलण्याची जबरदस्ती कुणीही माझ्यावर केली नाही. मी स्वच्छेने ते पाऊल उचलले, असे रेड्डी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
त्यांनी कल्याण यांच्या समर्थकांकडून आणि चाहत्यांकडून त्यांच्याविषयी सोशल मीडियात अपशब्दांचा वापर केला जात असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. आंध्रातील निवडणुकीत नामुष्कीजनक पराभव झाल्याने वायएसआर कॉंग्रेसला त्या राज्याची सत्ता गमवावी लागली. तर, तेलगू देसम, जनसेना आणि भाजपचा समावेश असणाऱ्या एनडीएने सत्ता काबीज केली.