पिंपरी, दि. 6 (प्रतिनिधी) – गेल्या तीन वर्षांपासून शहरातील नागरिकांवर दिवसाआड पाणी कपात लादण्यात आली आहे. नागरिकांना पुरेसा पाणी पुरवठा करण्यासाठी आता आंद्रा धरणातून 100 एमएलडी पाणी उपलब्ध झाले. तळवडे निघाजे येथे उभारण्यात आलेल्या जलउपसा प्रकल्पाचे काम शंभर टक्के पूर्ण झाले. मात्र काम पूर्ण होऊनही या अतिरिक्त पाणी पुरवठ्याला राजकीय श्रेय घेण्यासाठी विलंब होत आहे. राज्य सरकारमधील बड्या मंत्र्याच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यासाठी या प्रकल्पाला विलंब केला जात असल्याची सध्या चर्चा सुरू आहे.
पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या 30 लाखांच्या घरात गेली. त्यामुळे शहराला दैनंदिन होणारा पाणी पुरवठा अपुरा पडतो. नागरिकांना दररोज पाणी देण्यासाठी आंद्रा धरणातून 100 एमएलडी आणि भामा आसखेड धरणातून 167 एमएलडी पाणी कोटा मंजूर केला. यातील आंद्रा धरणातून शंभर एमएलडी पाणी उचलण्याची योजना पूर्णत्वास गेली. तळवडे निघोजे येथून शंभर एमएलडी पाणी उचलण्याचा मार्ग मोकळा झाला. त्याठिकाणी बांधण्यात आलेल्या जलउपसा प्रकल्पाचे काम शंभर टक्के पूर्ण झाले. चिखली जलशुध्दीकरण प्रकल्पाचे आणि उपसा प्रकल्पातील विद्युतविषयक कामे प्रलंबित राहिली. ही कामे अवघ्या पंधरा दिवसांत मार्गी लावली जातील, त्यानंतर नागरिकांना पाणी पुरवठा केला जाणार आहे, असे एक महिन्यापूर्वी अधिका-यांनी सांगितले होते. परंतु अजूनही ही कामे का सुरू आहेत? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
आंद्रा धरणातील शंभर एमएलडी पाणी योजना प्रकल्प राजकीय श्रेयवादात अडकली आहे. आंद्रा धरणातील पाणी कोटा मंजूर असताना तत्कालीन सत्ताधारी भाजपाला गेल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात प्रकल्पाचे काम करता आले नाही. ते काम तत्कालीन आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी प्राधान्यक्रमावर घेतले होते. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर त्यांची बदली करण्यात आली. त्यानंतर या प्रकल्पाचे श्रेय लाटण्यासाठी भाजपाकडून प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे. प्रकल्प पूर्णत्वाचा अहवाल स्थापत्य विभागाने राज्य सरकारकडे पाठविला आहे. तथापि, चिखली जलशुध्दीकरण केंद्राची 150 मीटर विद्युत वाहिनी भूमिगत करण्याचे किरकोळ काम राहिले आहे. दोन दिवसांत हे ही काम मार्गी लागून पाणी सोडले जाऊ शकते. परंतु, राज्य शासनाकडून तसे अद्याप कळविले नसल्याचे अधिकारी खासगीत सांगत आहेत.
भाजपाकडून राजकारण
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक असणाऱ्या स्थानिक आमदारांना महापालिकेतील सत्ताकाळात एकही प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण करता आला नाही. उलट नागरिकांच्या माथ्यावर दिवसाआड पाणी टंचाई लादण्यात आली. सध्या नागरिकांमध्ये असलेला रोष कमी करण्यासाठी आंद्रा धरणील पाणी योजनेचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न भाजपाकडून सुरू असल्याचे आरोप विरोधक करत आहेत. त्यामुळे तळवडे निघोजे येथील जलउपसा केंद्राचे सर्व काम पूर्ण झाले असताना हा प्रकल्प तातडीने पूर्ण न करण्यासाठी पालिका प्रशासकांवर दबाव टाकला जात असल्याची चर्चा आहे. स्थापत्य विभागातील अधिकारीही यासंदर्भात स्पष्टपणे काहीही बोलायला तयार नाहीत.