बेल्हे, (वार्ताहर) – रोहिणी संपून मृग नक्षत्र ही कोरडेठाक गेला असून जुन्नर तालुक्यातील अनेक गावात जोरदार पाऊस झालेला नाही. काही भागातील नांगरट केलेल्या शेतीतील ढेकळे देखील फुटलेले नाहीत. त्यामुळे शेतकरी चिंतेत दिसून येत आहे.
बंधारे,नदी, नाले, पाझर तलाव कोरडेठाक असून पावसाने अद्याप जोरदार हजेरी लावली नाही. थोड्याफार प्रमाणात झालेल्या पावसामुळे तालुक्यात 35 ते 40 टक्के पेरण्या झाल्या आहेत. अणे पठारावर अद्यापही टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.
मृग नक्षत्रामध्ये पाऊस पडेल अशी शेतकर्यांना अपेक्षा होती काही भागात वळवाचा पाऊस झाला परंतु बर्याच ठिकाणी अद्याप पाऊस समाधानकारक पडलेला नाही. त्यामुळे शेतकर्यांच्या लक्ष सध्या पावसाकडे लागलेले आहे.
जुन्नर तालुक्यातील कालदरे, कुमशेत, गोळेगाव, लेण्याद्री, जुन्नर, कुसुर, पारुंडे, वडज, बुचकेवाडी, दातखिळेवाडी, बेल्हे,आणे पठार, राजुरी, उंचखडक,
साकोरी, निमगाव सावा, तांबेवाडी, आळे, लवणवाडी, या भागात अत्यल्प पाऊस झालेला आहे. आर्द्रा नक्षत्रात पाऊस झाला तर उर्वरित राहिलेल्या खरीप हंगामाच्या पेरण्यांना वेग येण्याची शक्यता आहे. पावसाने गुंगारा दिला तर शेतकर्यांना अडचणी वाढणार आहेत.
या वर्षीच्या कडक उन्हामुळे या शेतातील विहिरीत तसेच कुपनलिका काही अपवाद वगळता कोरड्याठाक आहेत.
पेरणीची घाई न करण्याचे आवाहन
जुन्नर तालुक्यात काही ठिकाणी वळवाच्या पावसाने जोरदार हजेरी लावली वारुळवाडी, नारायणगाव, मांजरवाडी, 14 नंबर, भोरवाडी,कांदळी, वडगाव, आळेफाटा,पिंपरी पेंढार, पिंपळवंडी,
काळवाडी उंब्रज या भागामध्ये वळवाचा बर्यापैकी पाऊस झाला; परंतु तो पेरणीसाठी पुरेसा व समाधानकारक पाऊस नसल्याने शेतकर्यांनी पेरणीची घाई करू नका, असे आवाहन कृषी विभागाने केला आहे.