पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली व जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी मार्गावर सुरळीत वीजपुरवठा व वीजसुरक्षेसाठी ३५ अभियंता व १४० कर्मचाऱ्यांची विशेष नियुक्ती करण्यात आली आहे. पालखी मार्गावरील वीज यंत्रणेच्या देखभाल व दुरूस्तीचे कामे पूर्णत्वास गेली असल्याची महावितरणकडून देण्यात आली.
आषाढी यात्रेनिमित्त भोसरी, पिंपरी, रास्तापेठ, राजगुरुनगर व मुळशी विभागांच्या कार्यक्षेत्रात पालखी सोहळा रविवारी (दि. ३०) ते मंगळवार (दि. २ जुलै) पर्यंत होणार आहे.
या विभागांतील पालखी मार्गावर, विसावा व मुक्कामाच्या ठिकाणी अतिरिक्त स्वरुपात रोहित्रे व इतर साधनसामग्री तयार ठेवण्यात आली आहे. वीज सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना करण्यात आली आहे. आवश्यक ठिकाणी मोबाइल ट्रॉन्सफॉर्मरद्वारे वीजपुरवठा करण्यात येणार आहे.
पालखी सोहळ्यात यंदा महावितरणकडून वीजसुरक्षेचा विशेष व प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा जागर करण्यात येणार आहे. यामध्ये माहिती पत्रके, दृकश्राव्य माहितीपट, छोटेखानी प्रदर्शनी, वीजसुरक्षेबात संवाद, प्रात्यक्षिक आदींच्या माध्यमातून माहिती देण्यात येणार आहे.
आळंदी देवस्थानाजवळ प्रदक्षिणा मार्गावरील ३१५ मीटर तारांची उपरी वाहिनी काढून तेथे इन्सूलेशन असलेली एरिअल बंच वाहिनी लावण्यात आली आहे. तसेच पालखी मार्गावरील रोहित्रांना वीजसुरक्षेसाठी फायबर रीइन्फोर्स प्लॅस्टिकपासून तयार केलेले नव्या तंत्राचे मजबूत व टिकाऊ संरक्षक जाळ्यांचे कुंपण लावण्यात आले आहे.
वारकऱ्यांसह नागरिकांना आवाहन
पालखी मार्गावर किंवा मुक्कामाच्या दरम्यान कोणत्याही व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी असलेल्या वीजयंत्रणेपासून सावध व सतर्क राहावे.
वीजखांब, फिडर पिलर, डीपी बॉक्स किंवा अन्य ठिकाणच्या वीज यंत्रणेपासून सुरक्षित अंतर ठेवावे. वीजविषयक कोणतीही तक्रार असल्यास २४ तास सुरू असलेल्या 1800- 2123-435 किंवा 1800- 2333- 435 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.