ठाणे – महाराष्ट्रात महाविकास आघाडीला चांगले यश मिळत असल्याचे दिसून येत आहे. तर महायुती सद्या पिछाडीवर आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते ठाण्यातून बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यात मिळालेल्या अपयशाबद्दल देखील काही त्रुटी झाल्याचे मान्य केले.
ते म्हणाले की, ठाणे लोकसभा मतदारसंघातील लोकांचे मी आभार मानतो. नरेश म्हस्के हे विजयी झाले आहेत. बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादामुळे व विकासावर आम्ही ठाण्याची जागा जिंकलो आहे.
तर त्याचबरोबर कल्याण लोकसभेच्या जागेवर देखील विजय झाला आहे. राज्यसरकारने केलेल्या व मोदी सरकारने केलेल्या कामाची पोचपावती आहे. ठाणेकरांनी ठाकरे गटाच्या उमेदवाराला नाकारले. लवकरच एनडीएचे सरकार स्थापन होईल, त्याला शिवसेनेचा पाठिंबा राहिल.
एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला. ते म्हणाले की, काही लोक तडीपारीची भाषा करत होते, त्यांना सत्तेपासून दूर ठेवून लोकांनी त्यांना तडीपार केले. विकासाचे अजेंडा आमचा राहणार आहे.
या देशातील जनतेने पुन्हा एकदा मोदींना संधी दिलेली आहे. संविधान बदलणार म्हणून देशाची दिशाभूल केली. त्यामुळे आम्ही लोकांचा दिशाभूल दूर करण्यात आम्ही कमी पडलो, पण त्याचा विचार करून आम्ही पुन्हा कामाला लागू.
बाळासाहेबांच्या खऱ्या शिवसेनेला पहिला खासदार ठाणेकरांनी दिला आहे. 15 सीट्स लढल्या परंतु त्यातील काही ठिकाणी जागा जाहीर करण्यात त्याची उशीर झाला. त्यामुळे त्या त्रुटी दूर करू, त्यातून येत्या काळात मार्ग काढला जाईल, असेही शिंदे यावेळी म्हणाले.