बुलढाणा : शिवसेना फुटीनंतर लागलेला गद्दार हा शिक्का पुसण्यासाठीच एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांना पुढे केले असा आरोप लक्ष्मण हाकेंचे सहकारी नवनाथ वाघमारे यांनी केला आहे. ओबीसींच्या हक्काचं आरक्षण त्यांना मराठ्यांना द्यायचं आहे असा आरोपही वाघमारे यांनी केला. सिंदखेडराजा या ठिकाणी बोलताना त्यांनी हा आरोप केला.
काय म्हणाले नवनाथ वाघमारे?
एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सोडल्यानंतर त्यांच्यावर गद्दार हा शिक्का लागलेला आहे आणि तो कुठेतरी पुसला जावा म्हणून त्यांनी मनोज जरागेंना उभं केलेलं आहे. आमच्या हक्काचं आरक्षण त्यांना मराठ्यांना द्यायचा आहे, त्यामुळे या मुख्यमंत्र्यांकडून काय अपेक्षा करायच्या असे नवनाथ वाघमारे यावेळी म्हणाले. तसेच “आमचा दौरा ओबीसी बांधवांशी संवाद साधण्यासाठी आहे. आता ओबीसी रस्त्यावर उतरलाय, आतापर्यंत मराठा समाजाचा त्यांच्यावर दबाव होता. बोगस कुणबी प्रमाणपत्र रद्द करावे ही आमची प्रमुख मागणी आहे असेदेखील नवनाथ वाघमारे म्हणाले.
सरकारला दिला इशारा
सरकारने जर न्याय दिला नाही तर उद्या आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊ. जर सरकार आमचा अधिकार वाढवणार नसेल तर आम्ही निवडणूक सुद्धा लढवू असा इशारादेखील नवनाथ वाघमारे यांनी दिला आहे.
ओबीसी नेत्यांना केले आवाहन
मनोज जरांगेचा बॅकग्राउंड चांगला नाही, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी हाके यांनी केली आहे तर गोपीनाथ मुंडे हे भाजपाचे असूनही ओबीसींसाठी लढले, त्यांचा आदर्श घ्यावा असं आवाहन लक्ष्मण हाके यांनी ओबीसी नेत्यांना केले आहे.