मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस. आज राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांनी विधीमंडळात राज्याचा अर्थसंकल्प जाहीर केला. विधानसभा निवडणुका अवघ्या काहीच महिन्यांवर आल्या असल्याने या अंतरिम अर्थसंकल्पात अनेक घोषणांचा पाऊस पाडण्यात आला. या अर्थसंकल्पावरून भाजपमध्ये घरवापसी करण्यास इच्छुक असलेले एकनाथ खडसे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले एकनाथ खडसे?
एकनाथ खडसे म्हणाले की, हा अर्थसंकल्प निवडणुका समोर ठेऊन सादर केलेला आहे. वेगवेगळ्या घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आल्या. घोषणा चांगल्या आहेत. मात्र आता वेळ नाही. सध्या राज्य सरकारवर 7 लाख कोटींचे कर्ज आहे. हे कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही तर नवीन योजनांसाठी पैसे कुठून आणणार? अशी टीका एकनाथ खडसे यांनी राज्य सरकारवर केली आहे.
खडसेंची भाजपमध्ये घरवापसी कधी?
काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली होती. त्यामुळे पुन्हा एकदा एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनी जोर धरला आहे. त्यामुळे आता एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेश कधी होणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.