अयोध्या : येथील राम मंदिरातील गर्भगृह लोकांसाठी खुले केल्यानंतर पहिल्या मुसळधार पावसानंतर गर्भगृहाच्या छतावरून पाणी गळत होत आहे, अशी माहिती रामजन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी दिली. याशिवाय त्यांनी मंदिराचे बांधकाम पूर्ण होण्याच्या कालावधीबाबतही भाष्य केले आहे. मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास महाराज म्हणाले, पहिल्या पावसानंतर मंदिराच्या गाभाऱ्यात पाणी साचले.
जिथे प्रभू श्रीमाराची मूर्ती राजमान आहे, तिथे पहिल्याच पावसात गळती सुरु झाली आहे. पहिल्या पावसामुळे मंदिराच्या गाभाऱ्यात पाणी साचले होते. त्यामुळे बांधकामावेळी नेमकी काय चूक झाली. याची माहिती घेणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. राम लल्लाच्या मूर्तीसमोर पुजारी बसलेल्या आणि व्हीआयपी दर्शनासाठी ज्या ठिकाणी लोक येतात, त्या ठिकाणी थेट छतावरून पावसाचे पाणी गळत होते. पहिल्याच पावसामुळे कोटयवधी रुपये खर्चून बांधलेल्या राम मंदिराच्या गर्भगृहात पाणी शिरत असून पाण्याचा निचरा करण्याची योग्य व्यवस्था नसल्याचेही त्यांनी सांगितले.
मंदिराचे बांधकाम पूर्ण होण्याच्या कालावधीबाबत ते म्हणाले, मंदिराचे बांधकाम अद्याप सुरू आहे. या मंदिरात आणखी काही मुर्ती स्थापन करण्यात येणार आहे. २०२५ पर्यंत हे बांधकाम पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. मात्र, आता २०२४ सुरू आहे. २०२५ ला केवळ एक वर्ष बाकी आहे. त्यामुळे एका वर्षात हे बांधकाम पूर्ण होणे अशक्य आहे, असे ते म्हणाले. दरम्यान, गळतीबाबत समजताच मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी मंदिराला भेट दिली. यानंतर त्यांनी छताची दुरुस्ती करून ते जलरोधक करण्याच्या संबंधितांना सूचना दिल्या.