दहिवडी, (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या इंचगिरी रसाळ संप्रदायाचे आषाढी पायी वारीचे प्रस्थान सोमवार दि. १ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता होणार असल्याची माहिती मठाधिपती सदगुरु पांडुंरग महाराज रसाळ यांनी दिली.
इंचगिरी रसाळ संप्रदायाचे संस्थापक शंकर महाराज रसाळ यांनी १९७१ मध्ये या दिंडीचे आयोजन केले. त्यांच्या पश्चात सलग ५३ वर्षे हा दिंडी सोहळा होत असतो. मुंबई, मराठवाडा, कोकणसह महाराष्ट्राच्या विविध भागांतून भाविक या सोहळ्यात सहभागी होत असतात.
हा पायी दिंडी सोहळा क्षेत्र संतभूमी तरडगाव येथून प्रस्थान होणार असून वाठार स्टेशन, वडूथ, करंजेगांव, कोरेगाव, वर्धनगड, निढळ, कोळेवाडी, पिंगळी बु, गोंदवले खुर्द, म्हसवड, पिलीव, तांदुळवाडी, उपरी, वाखरी तळ याठिकाणी मुक्काम होणार आहे. तर धुळदेव याठिकाणी षष्टीनिमित्त शुक्रवारी दि. १२ जुलै रोजी सकाळी ११ वाजता पुष्पवृष्टीचा कार्यक्रम होणार आहे.
पालखी रथासाठी काळुरामशेठ सोनवणे, बाबासाहेब तापकिर देवाची आळंदी, शंकर गाडदे चरोली व गणेश ताटे एकांबे यांची मानाची बैलजोडी असून अथर्व रसाळ, रामचंद्र गायकवाड, संतोष चव्हाण, राम गुन्हाट, संतोष करे, भानुदास शिंदे, धारु गोरे, गोरख चव्हाण,
सतीश तिकडुवे, संजय चोरमले यांची वाहन सेवा तर आण्णा शिंदे यांचा पाण्याचा टँकर सहभागी होणार आहे. राजू नाईक कागल, बापू तिकडुवे, बाबाजी चोरमले, प्रकाश पवार यांची अश्वसेवा होणार आहे, अशी माहिती इंचगिरी रसाळ संप्रदायाचे अध्यक्ष तुकाराम रसाळ व दिनेश रसाळ यांनी दिली.