Devendra Fadnavis | Lok Sabha Election Result : लोकसभेत महाराष्ट्रात 45 च्या पुढे जागा जिंकणार असल्याचा दावा करणाऱ्या महायुतीला मोठा धक्का बसल्याचे दिसून आले.
राज्यात महायुतीला केवळ 17 जागांवर विजय मिळाला असून महाविकास आघाडीने 30 जागांवर मुसंडी मारली आहे. त्यामध्ये सर्वाधिक जागा या काँग्रेसने पटकावल्या आहेत. यात भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांचा राज्यात दारूण पराभव झाला आहे.
दरम्यान, आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन लोकसभेच्या निकालावर भाष्य केलं आहे. यावेळी बोलताना फडणवीसांनी लोकसभा निवडणुकीच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत राज्य मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
इतकंच नाहीतर फडणवीस यांनी असेही म्हटले की, नेता म्हणून महाराष्ट्रातील भाजपच्या पराभवाची सर्व जबाबदारी माझी आहे. पण मी हरणारा नाही, पण ताकदीने मैदानात उतरणार आहे.
परंतु नेतृत्वाला माझी विनंती आहे, मला उपमुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे आणि पक्षात काम करण्याची जबाबदारी द्यावी, असे वक्तव्य करत देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाला विनंती केली आहे.
ते पुढे म्हणाले, “मुंबईचा विचार केला तर मुंबईत महाविकास आघाडीला चार जागा आणि आम्हाला दोन जागा मिळाल्या आहेत. महाविकास आघाडीला मुंबईत 24 लाख 62 हजार मते आहेत. आणि महायुतीला 26 लाख 67 हजार मते आहेत.
म्हणजे मुंबईत दोन लाख मते आम्हाला जास्त मिळाली आहेत. भाजपचा विचार केला तर आमच्या 8 जागा अशा आहेत की, त्या चार टक्क्यापेक्षा कमी फरकाने हरलो. सहा जागा 30 हजाराच्या फरकाने हरलो. काही जागा तर दोन हजार आणि चार हजार मताने हरलो आहोत. याचा अर्थ ही निवडणूक घासून झाली. असं देखील देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.