सोनई, (वार्ताहर)- सोनई-वांबोरी रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून, ठिकठिकाणी खड्डे पडल्याने पायी चालणे सुद्धा मुश्किल झाले आहे. वाहन चालकांना मोठ्या कसरतीने वाहने चालवावी लागतात. ठिकठिकाणी खड्डे पडल्याने रस्त्याची चाळण झाली आहे.
धनगरवाडी, मोरया चिंचोरे आदी गावांतील नागरिकांचा दळणवळणासाठी याच रस्त्याचा वापर केला जातो. या रस्त्याचे कित्येक दिवसांपासून काम झाले नसल्याने खडी पूर्णपणे उघडी पडली आहे. वारंवार मागणी करूनही या रस्त्याची दुरुस्ती केली जात नाही. केवळ कधीतरी नुसते खड्डे बुजविले जातात मात्र नवीन रस्ता केला जात नाही.
या रस्त्याला साईडने कपारी पडल्याने मोठे वाहन आल्यास दुचाकीस्वाराला थांबून ते वाहन जाऊन द्यावे लागते. विद्यार्थी व विद्यार्थिनीची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने अपघाताचा धोका संभवतो. याआधी सुद्धा बरेच अपघात या रस्त्यावर झालेले आहेत.
धनगरवाडी, मोरया चिंचोरे व वाड्यावरील लोकांचा कायमच सोनई किंवा वांबोरीशी संपर्क येतो. त्यांना जाण्या येण्यासाठी याच रस्त्याचा वापर करावा लागतो. मात्र, रस्त्याची अवस्था बघून पर्याय मार्गाचा अवलंब करून वांबोरी या ठिकाणी जावे लागते. वांबोरी या ठिकाणी कांदा मार्केट व धान्य मार्केट असल्याने कायमच या भागातील लोकांचा वांबोरीला जाणे असते.
रस्ता खराब असल्याने ब्राह्मणीमार्गे वांबोरीला जाणे हे लोक पसंत करतात. नेवासा हद्दीपर्यंत रस्ता अत्यंत खराब झाला असून कात्रडपासून पुढे वांबोरीपर्यंत रस्ता चांगला आहे. राहुरी तालुक्याची हद्द सुरू होते तेथून पुढे रस्ता चांगला आहे मात्र नेवासा तालुका हद्दीत रस्त्याची अत्यंत दुरावस्था झालेली आहे.
खड्डे पडले असल्याने या रस्त्याने ट्रॅक्टरद्वारे मुरमाची वाहतूक सुरूअसल्याने खड्ड्यामध्ये अजून भर पडत आहे. मध्यंतरी साईडपाट्या दुरुस्त करून काटेरी झुडपे तोडली असल्याने आता तरी रस्त्याचे काम सुरू होईल, अशी अपेक्षा या भागातील नागरिकांना होती.मात्र, हे काम होऊन सुद्धा महिना उलटला तरी रस्त्याचे काम सुरू होण्याचे नाव घेईना.
शाळेची सुट्टी संपण्याआधी या रस्त्याची दुरुस्ती होणे आवश्यक आहे, अन्यथा या रस्त्याने विद्यार्थ्यांनी प्रवास कसा करावा हा मोठा प्रश्न आहे. याआधी परिवहन महामंडळाच्या एसटी बसेस या रस्त्याने जात होत्या, मात्र आता एकही बस या रस्त्याने जात नाही. वांबोरीला जाण्यासाठी खासगी वाहनाचा वापर करावा लागतो.
वांबोरी येथील लोकांना सोनईला येण्यासाठी खासगी वाहनाचा वापर करावा लागतो. राज्य परिवहन महामंडळाने किमान दोन बस या रस्त्याने सोडाव्यात, अशी मागणी या गावातील नागरिकांनी केली आहे.