डोर्लेवाडी, (वार्ताहर)- डोर्लेवाडी (ता. बारामती) येथील दिंडीने आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी देहूकडे प्रस्थान ठेवले असून या दिंडीला ग्रामस्थांच्या वतीने निरोप देण्यात आला.
येथील वैकुंठवासी गणपत आबाजी काळे महाराज दिंडी सांप्रदायिक भजनी मंडळ डोर्लेवाडी यांच्या वतीने गेल्या ४० वर्षापासून आषाढी वारीत संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात दिंडी सहभाग घेत आहे. २०० ते २५० वारकरी दरवर्षी देहू ते पंढरपूर पायी वारी करीत आहेत.
या वारीसाठी वारकऱ्यांचे देहूकडे प्रस्थान झाले. सकाळी संत सावता महाराज मंदिर संत तुकाराम मंदिर येथे दर्शन घेऊन दिंडीची ग्राम प्रदक्षिणा झाली. दिंडीच्या वाहनाचे विणेकरी, तुळस याचे पूजन करण्यात आले.
यावेळी सरपंच सुप्रिया नाळे, उपसरपंच विश्वजीत घोडे, ग्रामपंचायत सदस्य राणी नेवसे, सुमित्रा वामन, रेखा नाळे, विद्या काळकुटे, सचिन निलाखे, प्रशांत जाधव, संदीप कुदळे, सुनील म्हेत्रे, राहुल भोपळे, दिंडीचे प्रमुख बाळासाहेब महाराज नाळे, दत्तात्रय महाराज घुले, श्रीधर महाराज शिंदे, संत सावतामाळी देवस्थानचे अध्यक्ष रामचंद्र नाळे, माजी सरपंच बाळासाहेब सलवदे, वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पूजन केल्यानंतर दिंडीने देहूकडे प्रस्थान ठेवले. दरम्यान डोर्लेवाडी येथील दिंडी गेली ४० वर्षापासून ना नफा ना तोटा या तत्त्वावर वारकऱ्यांना पायवारी घडवत आहे. दिंडीच्या वतीने लोकवर्गणीतून पंढरपूर येथे भक्तनिवास बांधकाम करण्यात आले आहे. परिसरातील भाविकांची व वारकऱ्यांची मोफत राहण्याची सोय केली जाते.