पुणे – आषाढी वारी मार्गावर पुण्यातील मुक्कामानंतर संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्री तुकाराम महाराज यांची पालखी मंगळवारी सकाळी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. मंगळवारी (२ जुलै) पहाटे सहा वाजता आरती झाल्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा हडपसरमार्गे संत श्री सोपानदेवांच्या सासवडनगरीकडे मार्गस्थ होणार आहे, अशी माहिती पालखी विठ्ठल मंदिराचे विश्वस्त गोरखनाख भिकुले यांनी दिली.
त्याचबरोबर मंगळवारीच काकड आरती आणि पूजा झाल्यानंतर सकाळी सात वाजता संत तुकाराम महाराजांची पालखी हडपसर येथून सोलापूर रस्त्याने लोणी काळभोरकडे मार्गस्थ होणार असून, तेथे पालखीचा मुक्काम असेल, अशी माहिती निवडुंगा विठोबा मंदिराचे विश्वस्त आनंद पाध्ये यांनी दिली.
दरम्यान, या लाखो वैष्णवांच्या वास्तव्याने पुनीत झालेले पुणे शहर गेले दोन दिवस या वारकऱ्यांच्या सेवेत राहिले. त्यात अन्नदान, आरोग्य तपासणी, पाणी, स्वच्छता यांसह वारकऱ्यांच्या चप्पल-बुटांची दुरुस्ती, मालीश, रेनकोट वाटप या उपक्रमांमध्ये पुणेकर उत्स्फूर्त सहभागी झाले.