शिक्रापूर, (वार्ताहर)- दहिवडी (ता. शिरुर) येथे (दि.२१) जून रोजी यश गायकवाड या दहा वर्षीय बालकाचा संशयित मृत्यू झाल्याची घटना घडली. बिबट्याच्या हल्ल्यात यशचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे.
मात्र, मृत्यूचे नेमके कारण समोर आलेले नसताना देखील वनविभागाकडून परिसरात रात्रंदिवस पहारा देत जनजागृती करण्यात येत आहे.
दहिवडी येथील मांजरे वस्ती येथे यश सुरेश गायकवाड याचा मृतदेह शेतात आढळून आला. मात्र, बिबट्याचा हल्ल्यात यशचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात असताना वनविभागाला बिबट्याबाबत काही निदर्शनास आले नाही. मात्र, परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे वनविभागाने पाच पिंजरे लावत बिबट्याला जेरबंद करण्याच्या उपाययोजना सुरु केल्या आहेत.
शिरुर वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल गौरी हिंगणे व गणेश पवार यांच्या नेतृत्वाखाली वनरक्षक प्रमोद पाटील, बबन दहातोंडे, विशाल चव्हाण, संतोष भुतेकर, नारायण राठोड, चालक अभिजित सातपुते, शिरुर वनविभाग रेस्क्यू टीमचे हनुमंत कारकुड, नवनाथ गांधीले,
शेरखान शेख, अमोल कुसाळकर, जयेश टेमकर, अविनाश सोनवणे, शुभम वाघ, रोहित येवले, शुभम शिस्तार, सुदर्शन खराडे, श्रेयस उचाळे, ऋषिकेश विधाटे, शरद रासकर यांच्या माध्यमातून परिसरात २४ तास पहारा सुरु ठेवला आहे.
बिबट जनजागृती करण्यात येत आहे. दहिवडीचे पोलीस पाटील जालिंदर पवार, गोरक्ष काळे आदी युवक देखील वनविभागाला सहकार्य करीत रात्रगस्तीमध्ये सहभागी होत आहे.
बालकाच्या मृत्यूचे गूढ उलगडणार कधी
दहिवडी येथे यश गायकवाड याचा मृतदेह आढळून आला. मात्र, बिबट्याच्या हल्ल्याबाबत काही ठोस पुरावे मिळाले नसल्याने शवविच्छेदन अहवाल व जखमेवरील रक्त्याचे नमुने अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे. बालकाच्या मृत्यूचे गूढ उलगडणार कधी, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.