दहिवडी – गहाळ झालेल्या मोबाइलबाबत दहिवडी पोलिसांनी राज्यातील विविध भागांत जाऊन संबंधितांकडून 24 मोबाइल हस्तगत केले. यातील अनेकांचे मोबाल गहाळ तर काहींचे मोबाइल चोरीला गेले होते. दहिवडी पोलिसांच्या या कामगिरीमुळे मोबाइलमधील ईएमआय नंबर जुळवून मोबाइल माघारी मिळवले. मोबाइल चोरांना व ते विकत घेणाऱ्यालाही मोठी चपराक बसली.
यापुढे आता पावतीशिवाय मोबाइल खरेदी करण्याचे धाडस लोक करणार नाहीत. पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल, दहिवडीच्या उपअधीक्षक श्रीमती अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली दहिवडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी नागरिकांचे हरविलेले मोबाइल शोध घेण्यासाठी पोलीस अमंलदारांचे पथक तयार करुन त्यांना सूचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांनी सीईआयआर पोर्टल व इतर तांत्रिक बाबीच्या आधारे हरविलेले मोबाइलबाबतची माहिती मिळवून चिकाटीने मोहीम राबविली.
गहाळ व चोरी झालेले एकूण 7 लाख 50 हजार रुपये किमतीचे एकूण २४ मोबाइल हस्तगत करण्यात यश आले. उपअधीक्षक अश्विनी शेंडगे यांच्या हस्ते मूळ तक्रारदारांना त्यांचे मोबाइलचे परत करण्यात आले. सहायक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, हवालदार बापू खांडेकर, नितीन धुमाळ, निलेश कुदळे, असिफ नदाफ, महेंद्र खाडे. सायबर पोलीस ठाण्याचे महेश पवार यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. मोबाइल शोध मोहीम सातत्याने राबवण्यात येणार असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी सांगितले.