Lok Sabha Result 2024 – आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नको असल्याचा संदेश देशाने या निवडणुकीतून दिला, असे भाष्य कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले. आताची निवडणूक म्हणजे राज्यघटना वाचवण्यासाठीची लढाई होती.
राज्यघटना वाचवण्यासाठी देशातील जनता एकत्र येईल याची मला मनातून खात्री होती. देशातील गरीब आणि वंचित जनता राज्यघटना वाचवण्यासाठी इंडिया आघाडीच्या बरोबरीने उभी राहिली, असे राहुल पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले.
केंद्रात सरकार स्थापण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून इंडिया आघाडी इतर पक्षांशी संपर्क साधणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राहुल उत्तरले, आमच्या मित्रपक्षांशी सल्लामसलत केल्याशिवाय आम्ही काही बोलणार नाही.
इंडियाची बैठक उद्या (बुधवार) होईल. त्यामध्ये निर्णय होईल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. त्यामुळे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा जेडीयू आणि तेलगू देसम पक्षापर्यंत इंडिया पोहचणार का, याविषयीची उत्सुकता ताणली गेली आहे.