नवी दिल्ली : कॉंग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जम्मू-काश्मीरवरून विविध प्रश्नांची सरबत्ती केली आहे. जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा पुन्हा केव्हा मिळणार, तिथे विधानसभा निवडणूक केव्हा होणार आदी प्रश्नांचा त्यामध्ये समावेश आहे. केंद्रात सलग तिसरा कार्यकाळ मिळाल्यानंतर मोदी प्रथमच जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. त्याचा संदर्भ घेऊन कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी मोदींना सहा प्रश्न विचारले.
जम्मू-काश्मीरमधील सुरक्षास्थिती खराब का बनली, काश्मिरी पंडितांचे समर्थन करण्यात केंद्र सरकार अयशस्वी का ठरले, असे सवाल त्यांनी केले. जम्मू-काश्मीरमध्ये चांगले कार्य केल्याचा दावा सरकार करते. तसे असेल तर तेथील जनता भाजपला का नाकारते? जम्मू-काश्मीरमध्ये किती गुंतवणूक आली, अशी विचारणाही त्यांनी केली. मोदी सरकारने २०१९ मध्ये राज्यघटनेचे कलम ३७० हटवले.
त्यामुळे जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्दबातल ठरला. जम्मू-काश्मीरला केंद्रशासित प्रदेश बनवण्यात आले. त्यानंतर जम्मू-काश्मीरला योग्य वेळी पूर्ण राज्याचा दर्जा बहाल करण्याचे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले होते. त्याची आठवण रमेश यांनी करून दिली. जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणूक प्रदीर्घ काळपासून प्रलंबित आहे. ती निवडणूक चालू वर्षीचा सप्टेंबर महिना संपण्याआधी घेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्याकडेही रमेश यांनी लक्ष वेधले.