मुंबई : राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे आज सरकारने राज्यासाठीचा अर्थसंकल्प जाहीर केला. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. अजित पवार यांनी सादर केलेला अर्थसंकल्प सर्वसमावेशक आहे. आम्ही सर्वसामान्यांचे सरकार म्हणतो, तेव्हा शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला-भगिनी, युवा, ज्येष्ठ, वारकरी सगळे त्यामध्ये येतात. आमचा अर्थसंकल्प पाहून विरोधकांचे चेहरे पांढरे पडले होते. दिलेला शब्द तंतोतंत पाळणार आहोत. हा निश्चयाचा, निर्धाराचा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांनी दिली.
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे माझी लाडकी बहीण योजना. ही योजना अतिशय महत्त्वाची असून, दरमहा दीड हजार रुपये खात्यात जमा होणार आहेत. तसेच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून वर्षाला तीन सिलेंडर मोफत देणार आहोत. त्यामुळे विरोधक गॅसवर आले आहेत. युवक बेरोजगार असल्याचा दावा विरोधकांकडून केला जातो. परंतु, आम्ही आल्यावर सरकारी नोकऱ्यांवरील निर्बंध हटवले. जवळपास १ लाख सरकारी नोकऱ्या मुलांना मिळाल्या आहेत. खासगी कंपन्यांमध्ये स्कील डेव्हलपमेंट, स्टार्ट अप आणि अन्य माध्यमातून लाखो लोकांना नोकऱ्या मिळाल्या आहेत. जर्मनीत चार लाख नोकऱ्यांचा एमओयू आपल्या सरकारसोबत झाला आहे. जे सुशिक्षित बेरोजगार आहेत, त्यांना १० हजार रुपये अप्रेंटिशिप देणार आहोत. हादेखील एक ऐतिहासिक निर्णय आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
उद्धव ठाकरेंवर केली टीका
लाडकी बहीण योजनेवर टीका करताना उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, लाडका भाऊ योजना का राबवत नाही. यावर बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आम्ही लाडका भाऊ योजना केली आहे. १० हजार रुपये देत आहोत. पण त्यांनी अडीच वर्षे लाडका बेटा योजना राबवली, त्याचे काय, असा खोचक सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.
अजित पवार शब्दाचे पक्के
अजितदादा वाद्याला पक्के आहेत. त्यामुळे हे सरकार दिलेला शब्द पाळणारे आहेत. आतापर्यंत जे जे बोललो, ते ते पूर्ण करून दाखवले आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितले. दरम्यान, अर्थसंकल्पात सर्व पैशांची तरतूद करून या सर्व योजना केलेल्या आहेत असेदेखील एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.