नारायणगाव, {मंगेश रत्नाकर} – राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दुफळी पडल्यानंतर शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी (पवार) विरुद्ध राष्ट्रवादी (दादा) गटाच्या आजी-माजी खासदारांमध्ये लढाई रंगली.
त्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघात डॉ. अमोल कोल्हे (तुतारी चिन्ह), शिवाजीराव आढळराव पाटील (घड्याळ चिन्ह) दोघांपैकी कोण विजयी गुलाल उधळणार यापेक्षाही शरद पवार की अजित पवार यांचा पठ्ठ्या मंगळवारी (दि. 4) विजयी होणार याकडे शिरूर लोकसभा मतदारसंघातील जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघ यंदा अजित पवार यांनी विद्यमान खासदार (शरद पवार गटाचे उमेदवार )डॉ. अमोल कोल्हे यांना तुम्ही कसे निवडू येता असे म्हणत आव्हान दिले होते. तर अनेक उमेदवारांस अनेक मुद्द्यांची चाचपणी केल्यानंतर अखेर अजित पवार यांना शिवसेना (शिंदे गटाचे) माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना आयत करीत महायुतीकडून उमेदवारी दिली होती.
त्यामुळे या मतदारसंघात डॉ. कोल्हे, आढळराव यांच्यापेक्षा अजितदादा पवार यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात डॉ. अमोल कोल्हे व शिवाजी आढळराव पाटील यांच्यात झालेली लढत चुरशीची झाली असल्याने नेमकी कोण जिंकेल यावर अनेक मतमतांतरे दिसून येतात. दोन्ही गटाचे समर्थक आपलाच विजय होईल असे म्हणत आहेत.
आमदारांची परीक्षा…
शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या बाजूने लोकसभा मतदारसंघातील पाच आमदार मदतीला असले तरी प्रत्यक्षात झालेले मतदान आणि विधानसभा मतदारसंघात मिळालेली मते यावरून आमदारांनी आढळराव पाटलांसाठी किती प्रामाणिकपणे काम केले हे आजच्या निकालात स्पष्ट होईल.
मदतीला पाच आमदार असूनही लोकसभेच्या निवडणुकीत काही वेगळे घडले तर भविष्यात येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीची गणिते बदललेली असतील.
जुन्नर तालुक्यात आमदार अतुल बेनके यांनी आढळराव पाटील यांचे तिकीट जाहीर झाल्यापासून प्रचारात सहभाग घेतला होता. ओतूर येथे झालेल्या सभेत महायुतीतील सर्वच घटक पक्षांनी आढळराव पाटलांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केल्याने कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा प्राप्त झाली होती.
एक्झिट पोलवर डॉ.कोल्हेंचा बोलबाला
शिरूर लोकसभा मतदार संघात डॉ.अमोल कोल्हे यांना शरद पवार गटाकडून वेळीच उमेदवारी जाहीर झाल्यामुळे त्यांना निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला होता. समाजमाध्यमात तसेच एक्झिट पोलवर डॉ.कोल्हे यांचा बोलबाला होता. सोबतीला पक्ष फुटीमुळे शरद पवार गटाला सहानुभूतीची लाट होती. त्यामुळे डॉ. अमोल कोल्हे यांना किती फायदा होतो हे निकालात स्पष्ट होईल.
निकालानंतर विधानसभेची दिशा ठरवणार
लोकसभा निवडणुकीचा निकाल हा अनेक अर्थाने महत्त्वाचा ठरणार आहे. विधानसभेच्या निवडणुका उंबरठ्यावर येऊन पोहोचलेल्या असल्याने नक्कीच या निवडणुकांच्या निकालाचा परिणाम विधानसभेवर झालेला असेल. कदाचित महाविकास आघाडी व महायुतीतील घटक पक्ष स्वतंत्ररित्या निवडणूक लढवण्याचा निर्णय घेऊ शकतात.
अजितपदादांची प्रतिष्ठापणाला
शिरूर लोकसभा मतदार संघातील निवडणूक अजित पवार यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली आहे. शिरूर महाविकास आघाडीचा उमेदवार कसा निवडून येतो ते बघतोच असे म्हणून निर्माण केलेली दादागिरी मतदार मोडीत काढतात की त्यांच्या म्हणण्यानुसार शब्द खरा करून दाखवतात हे निवडणुकीच्या निर्णयात स्पष्ट होईल.
कार्यकर्ते जोमात
शिरूर लोकसभा निवडणुकीचा निकाल आपल्याच बाजूने लागेल असा आत्मविश्वास महाविकास आघाडी व महायुतीला असल्याने दोन्ही गटांचे कार्यकर्ते जोमात असल्याचे दिसून येते. प्रत्येक कार्यकर्त्याला आपलाच उमेदवार निवडून येणार असे वाटत असल्याने निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.