नारायणपूर : छत्तीसगढमध्ये मंगळवारी सुरक्षा दलांनी 5 नक्षलवाद्यांचा खात्मा केला. ती चकमक नारायणपूर जिल्ह्यातील जंगलात झडली. डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्ड, विशेष कृती दल, बीएसएफ आणि आयटीबीपी या दलांनी रविवारपासून नक्षलींविरोधात संयुक्त शोधमोहीम हाती घेतली. त्या मोहिमेवेळी सुरक्षा जवान आणि नक्षली संबंधित जंगलात आमनेसामने आले.
त्यांच्यातील चकमक नक्षलींना मोठा हादरा देणारी ठरली. त्या चकमकीनंतरही सुरक्षा दलांनी शोधमोहीम सुरूच ठेवल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली. चालू वर्षी सुरक्षा दलांकडून नक्षलींविरोधात धडक मोहिमा राबवल्या जात आहेत. त्यामध्ये आतापर्यंत 138 नक्षली ठार झाले आहेत. त्यामुळे सुरक्षा दलांच्या मोहिमा नक्षली संघटनांना जोरदार धक्के देणाऱ्या ठरत असल्याचे मानले जात आहे.