बिजींग – वर्ष २०२० मध्ये चीनच्या सैनिकांनी पूर्व लडाख भागात आगळीक करण्याचा प्रयत्न केला होता. सीमा ओलांडून भारतीय हद्दीत घुसण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता, मात्र भारतीय सैन्याने त्यांना चोख प्रत्युत्तर दिले होते.
त्यावेळी झालेल्या हाणामारीत कोणाचे किती सैनिक मृत्युमुखी पडले याचा बराच गदारोळ माध्यमांमध्ये झाला मात्र भारतीय लष्कर वरचढ ठरले व त्यांनी चीनी सैनिकांना जे घाव दिले ते किती खोल आहेत याची माहिती आता समोर येऊ लागली आहे.
त्या संघर्षाचीच परिणती अशी झाली आहे की कधी आपल्या बराकीच्या बाहेर न पडणारे चीनी सैनिक आता हवामान कितीही खराब असो सीमेवर गस्त घालताना दिसतात. भारतीय सैनिकांनी त्यांना जेथे पिटाळून लावले होते तेथे आता त्यांच्या मनातील भिती घालवण्यासाठी चीनला विविध उपाय योजावे लागत आहेत.
त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी चक्क एक बँक्वेट हॉल उभारण्यात आला आहे व दोन चीनी सैनिकांचा विवाह अलिकडे येथे संपन्न झाला. काही वृत्तसंस्थांनी दिलेल्या बातमीनुसार सीमेवर जेथे पेट्रोलींग केले जाते तेथेच बँक्वेट हॉल उभारण्यात आला आहे. हे ठिकाण १८ हजार फूटांपेक्षा जास्त उंचीवर आहे.
सामान्य माणसाला येथे श्वास घेणेही जिकरीचे असते आणि तो तेथे फार काळ तग धरू शकत नाही. भारतासोबतच्या संघर्षामुळे चीनी सैनिक मानसिक दबावाखाली गेले होते आणि आहेत. त्यांचे मनोबल कायम राखण्याचा प्रयत्न केला जात आहे.
पूर्वी या सैनिकांना कुटुंबापासून बराच काळ लांब ठेवणे, वेळेवर सुटी न देणे आदी जाचाला सामोरे जावे लागायचे. सरकारकडून चीनी सैनिकांचा अपेक्षाभंग होत चालला होता. मात्र सैन्य कपात करण्याची चीनची इच्छा नाही. त्यामुळे वेगळ्या मार्गांनी ते मनोधैर्य कायम ठेवण्याचे प्रयत्न करत आहेत.
वेतन वाढवले
भारतीय जवानांशी झालेल्या धुमश्चक्रीनंतर चीनने जवानांच्या वेतनात ४० टक्के वाढ केली. फायटर पायलट आणि सबमरीनमध्ये तैनात कर्मचाऱ्यांच्या वेतनात यापेक्षा अधिक वाढ केली गेली आहे.
जवानांना आता आपल्या कुटुंबीयांसोबत राहण्याचीही परवानगी देण्यात आली आहे. इतरही सुविधा त्यांना दिल्या जात आहेत. चीनमध्ये वन चाईल्ड पॉलिसी होती. त्यामुळे मुलांना लष्करात पाठवण्यास कुटुंबे तयार नसत. त्यामुळे त्या धोरणातही आता बदल केले गेले आहेत.