लखनऊ : केंद्रातील एनडीए सरकार पूर्णपणे स्थिर नाही. ते केव्हाही अस्थिर बनेल. त्यामुळे देशभरात बसपचा जनाधार मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रिय व्हावे, असे आवाहन त्या पक्षाच्या प्रमुख आणि उत्तरप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी रविवारी केले.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बसपची नामुष्कीजनक पीछेहाट झाली. त्या पक्षाला उत्तरप्रदेशात एकही जागा जिंकता आली नाही. मात्र, पीछेहाट विसरून मायावती बसपला पुन्हा उभारी देण्याच्या उद्देशातून सरसावल्या आहेत. त्यातून त्यांनी पक्षाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन पक्षकार्यासाठी सज्ज होण्याच्या सूचना दिल्या. देशातील राजकीय स्थिती ध्यानात घेऊन कार्यकर्त्यांनी सतर्क रहावे, असेही त्यांनी म्हटले.
बसपच्या पीछेहाटीचे खापर त्यांनी विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीवर फोडले. राज्यघटनेचे रक्षण आणि इतर मुद्द्यांवरून चुकीचा प्रचार करून विरोधी पक्षांनी मतदारांची दिशाभूल केली. त्यामुळे बसपचे नुकसान झाले, असा दावा त्यांनी केला. यावेळच्या लोकसभा निवडणुकीत एनडीए विरूद्ध इंडिया अशी लढत झाली. त्या दोन्ही आघाड्यांपासून दूर राहत बसपने स्वबळावर निवडणूक लढवली. मात्र, तो पक्ष बिल्कूल प्रभाव पाडू शकला नाही.