मुंबई : आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यात ओबीसी आणि मराठा समाज यांच्यातील वाद पेटताना दिसत आहे. सगेसोयरे आणि कुणबी नोंदीवरून हा वाद पेटला आहे. यादरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठी भीती व्यक्त केली आहे. जातीपातीचं राजकारण वेळीच रोखलं पाहिजे नाहीतर महाराष्ट्रात उत्तर प्रदेश आणि बिहारसारखे खून पडतील, अशी भीती राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.
काय म्हणाले राज ठाकरे?
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत असताना सध्या राज्यात सुरू असलेल्या मराठा आणि ओबीसी आंदोलनावर आपली प्रतिक्रिया दिली. त्यावेळी ते म्हणाले ‘आता सर्व समाजाला ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. जे नेते-पुढारी आहे, जातीपातीचं विष पसरवत आहे. हे फक्त हातात मतं घेतील आणि लोक त्यांना मत सुद्धा देतील. ही भोळसट लोक आहे. अलीकडेच काही लहान मुलींचा व्हिडीओ पाहिला, त्या चिमुरडी जातीपातीवर बोलत होत्या. हे कधी बोललो होतो मी, शाळा कॉलेजपर्यंत हे विष पसरत चाललं आहे. महाराष्ट्रातील लोकांनी हे दूर ठेवलं पाहिजे. कितीही आवडता व्यक्ती असला तरीही हे टाळलं पाहिजे, असं परखड मत राज ठाकरेंनी व्यक्त केलं.
तसंच, जर असंच विष पसरवलं जात असेल तर पुढच्या पिढीनं कसं जगलं पाहिजे. काय होणार महाराष्ट्राचं, उत्तर प्रदेश, बिहारमध्ये जे होतंय ते महाराष्ट्रात होत आहे. उद्या खून पडतील’ अशी चिंतादेखील राज ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली.