कार्ला, (वार्ताहर) – लोणावळा, मळवली, कार्ला परिसरात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून कार्ला – मळवली दरम्यान तात्पुरता बनवलेल्या पर्यायी पुलावरून पाणी वाहू लागले आहे.
परिणामी लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तर, नवीन पुलाचे काम सुरु असून पाच आर्चवरचा भराव पूर्ण आहे. पाच आर्चवरील मो-या व भराव पूर्ण होण्यास महिना लागू शकतो असा अंदाज आहे.
कार्ला – मळवली दरम्यान असलेल्या नवीन पुलाचे काम सुरू असून नागरिकांना पर्यायी पूल बनवत रस्ता उपलब्ध करून देण्यात आला होता. परंतु, रविवारी या पूलावरून पाणी वाहू लागल्याने तो वाहतुकीसाठी धोकादायक ठरू शकतो.
रस्ता पाण्याखाली गेल्याने लोणावळा ग्रामीण पोलिसप्रशासचे पोलीस उपनिरिक्षक अरुण दरेकर, महेंद्र वाळुंजकर, कर्मचारी दुर्गा जाधव, सुरज गायकवाड यांंच्यासह पोलिलीस कर्मचारी पर्यटकांच्या व नागरिकांच्या सुरक्षतेसाठी प्रयत्न करत होते.
तर, रविवारी असल्यामुळे लोहगड, विसापूर, भाजे धबधबा, पाटण धबधब्यावर वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी परिसरात हजारो पर्यटक दाखल झाले आहेत. अशा परिस्थितीत या पुलावरून वाहतूक करणे जिकरीचे होणार असून एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मळवली परिसरातील नागरिकांनी लोणावळा तसेच मुंबईकडे जाण्यासाठी देवले औढे, औंढोली तसेच सदापूर, वाकसई रस्ता याचबरोबर कामशेतकडे अथवा पुण्याकडे जाण्यासाठी बोरज, पाथरगाव पर्यायी रस्त्यांचा वापर करावा, असे आहवान लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी केले.