संदीप राक्षे
सातारा – लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीने चांगले यश मिळवल्याने विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस शरदश्चंद्र पवार पक्षाने सातारा जिल्ह्यावर लक्ष केंद्रित केले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचेही (अजित पवार) सातारा जिल्ह्यावर बारकाईने लक्ष असून पुढील महिन्यांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांचा टप्प्याटप्प्याने आधी दौरा नंतर मेळावा असा कार्यक्रम होणार असल्याचे निश्चित झाले आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोन्ही नेत्यांना सातारा जिल्ह्याची राजकीय नस, सहकाराच्या जाळ्याची आणि त्यातून पुढे आलेल्या नेतृत्वाची आणि कार्यकर्त्यांची पुरेशी माहिती आहे. त्यातूनच आपल्याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या मजबुतीसाठी दोन्ही नेत्यांनी लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे. सातारा जिल्ह्यामध्ये सात विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवार देणार असल्याचे शरद पवार यांनी नगर येथील मेळाव्यात स्पष्ट केले आहे. त्यादृष्टीने लोकसभा निवडणुकीच्या विजयात रममाण न होता पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातून त्यांनी बांधणी सुरू केली आहे. पुढील महिन्यात या राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा कार्यक्रम घेतला जाणार असल्याच्या शक्यता आहेत. सातारा जिल्ह्याने शरद पवार यांना नेहमीच साथ दिली आहे. माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये पवारा यांनी धैर्यशील मोहिते यांना निवडून आणले. तर सातारा मतदारसंघात त्यांचे प्रयत्न अपुरे पडल्यामुळे सातारा लोकसभा मतदारसंघ निसटत्या मतांनी महायुतीकडे गेला आहे.
खासदार उदयनराजे भोसले यांच्या रूपाने जिल्ह्यात प्रथमच कमळ फुलले आहे. असा दगा फटका पुन्हा जिल्ह्यात होऊ नये याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसची पुन्हा तळातून बांधणी करण्यासाठी गोविंद बागेत लवकरच पुन्हा बैठक होणार असल्याची चिन्हे आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांना राज्यसभेवर खासदारकी देण्याचा शब्द दिला होता. वाई तालुक्यात झालेल्या सभेने महायुतीला बूस्टर मिळाला तरी सुद्धा वाई मतदारसंघातून अपेक्षित असलेले मताधिक्य उदयनराजे भोसले यांना मिळू शकले नाही. या गोष्टींचे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी अजित पवार यांनी आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने जिल्ह्याची मशागत करणे मनावर घेतले असून तशा सूचना जिल्हा कार्यकारणीला दिल्या आहेत. जिल्ह्याचे कार्याध्यक्ष अमित कदम त्यादृष्टीने सक्रिय झाले आहेत. अजित पवार यांनी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या माध्यमातून विधानसभेची पूर्वतयारी नगर जिल्ह्यातूनच केलेली आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांची विधानसभेची तयारी नगर जिल्ह्यातूनच सुरू झाली असून पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण या तिन्ही प्रादेशिक रचनांमध्ये दोही राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांना किती टस्सल देतात हे पाहणे आता रंजक ठरणार आहे.
जिल्हा कोणत्या पवारांबरोबर राहणार?
बारामतीच्या मैदानावर खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला. हा पराभव अजित पवार यांना चांगला जिव्हारी लागला आहे. बारामतीत आपणच सुप्रीम आहोत हे शरद पवार यांनी दाखवून दिले आहे. सातारा जिल्ह्यावर सुद्धा एकमेकांवर कडी करण्याच्या दृष्टीने स्पर्धा होणार हे लक्षात घेऊन शरद पवार यांनी आपल्या नेहमीच्या राजकीय चाली खेळायला सुरुवात केली आहे. शशिकांत शिंदे यांचा झालेला पराभव आणि त्याचे आत्मचिंतन लवकरच साताऱ्यात होणाऱ्या बैठकीत होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर अजित पवार यांच्या गटात ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांचा गट, आमदार मकरंद पाटील व आमदार दीपक चव्हाण सामील झाले आहेत. तर शरद पवार गटात कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील व विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे असे बलाबल आहे. सातारा जिल्हा हा नेमक्या कोणत्या पवारांचा याचे उत्तर आगामी विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे