कान्हे, (वार्ताहर) – मावळ तालुक्यातील पीएमपी बस थांब्यांच्या पाट्या चुकीच्या ठिकाणी लावलेल्या असून फलक एका ठिकाणी तर प्रवासी दुसऱया ठिकाणी उभे रहात आहेत. तसेच ज्या ठिकाणी फलक लावलेले आहेत तेथे प्रवाशांना उभा राहण्यासाठी जागाही नाही. प्रवासी शेड तर दूरच आहे. परिणामी प्रवाशांचे हाल होत आहे.
गेल्या काही वर्षांपासून मावळ तालुक्यात पीएमपी बससेवा सुरू आहे. निगडी ते लोणावळा या मार्गावर पीएमपी बस धावते. या बस सेवेच्या दिवसभरात अनेक फेऱ्या होतात. थांब्यांसाठी ठिकठिकाणी फलक लावण्यात आलेले आहेत. तसेच, हे फलक अशा ठिकाणी ठिकाणी लावले आहेत की, जेथे प्रवाशांना उभे राहण्याची सोय देखील नाही.
परिणामी प्रवाशांना उभे रहाण्याची जागा पाहून थांबावे लागते. त्यामुळे फलक एकिकके व प्रवासी दुसऱया ठिकाणी थांबतात. त्यात अनेकदा बस निघून जाते. त्यामुळे दुसऱया बसची वाट पहात प्रवाशांना उभे रहावे लागत आहे.
नायगाव येथील लावलेला बस थांब्याचे फलक हा प्रवासी उभा राहण्याच्या ठिकाणापासून 200 मीटरच्या अंतरावर लावलेला आहे. बस थांब्याची जागा येथील एका ढाब्याजवळ असल्याने प्रवासी तेथे उभे राहतात.
मात्र, पीएमपी बस थांबा फलक हा प्रवासी उभा असलेल्या ठिकाणाहून 200 मीटरच्या अंतरावर आहे. तर, काही ठिकाणी फलकच नाहीत. त्यामुळे योग्य ठिकाणी बस थांब्याचे फलक लावण्याची प्रवासी मागणी करत आहेत.
नायगाव यथील बस थांबा फलक हा प्रवासी उभे राहण्याच्या ठिकाणापासून 200 मीटर लांब लावला आहे. बस चालक जेथे बस थांबा फलक आहे तेथे थांबून निघून जातो. चालकास विचारणा केल्यास तो नियमावर बोट ठेवून सांगतो की जेथे फलक लावला आहे तेथेच थांबण्याचे सांगितले जाते. लावलेले फलक हे चुकीच्या ठिकाणी आहे. त्यामुळे प्रवासी शेड नसले तरी किमान योग्य ठिकाणी फलक तरी लावावा. – प्रताप गुंजाळ, बस प्रवासी