सातारा, (प्रतिनिधी)- भाजपच्या वरिष्ठ कार्यकारिणीच्या मुंबई येथे होणाऱ्या चिंतन बैठकीमध्ये महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीची चर्चा होणार आहे. भाजपची जिल्हा कार्यकारिणी प्रदेश कार्यकारिणीच्या निरोपाच्या प्रतीक्षेत असून या बैठकीनंतर प्रत्यक्ष हालचालींना सुरुवात होणार आहे. जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी या माहितीला दुजोरा दिला.
भाजपचे केंद्रीय नेते व महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव व अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची चिंतन बैठक होत आहे. या बैठकीमध्ये महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकांची रणनीती काय असावी यावर चर्चा होणार आहे.
त्यानंतर महाराष्ट्रातील विस्तारक, केंद्रप्रमुख, बूथ रचनेचे सदस्य, मंडल प्रमुख यांची बैठक 13 जुलै रोजी पुणे येथे होणार असून भाजपच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शक सूचना दिल्या जाणार आहेत .या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार आहेत.
चिंतन बैठकांच्या निमित्ताने सातारा जिल्हा कार्यकारिणीचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम तसेच कार्यकारिणीचे सदस्य सक्रिय झाले असून पुन्हा एकदा जिल्ह्यातील तीन हजार बुथरचनांचा आढावा घेण्यास सुरुवात झाली आहे.
लोकसभा निवडणुकांमध्ये ज्या ठिकाणी महायुतीला दगा फटका झाला किंवा मताधिक्य मिळाले नाही अशा चुकांचा आढावा घेऊन त्या ठिकाणी मजबूत परिस्थिती निर्माण करणे हे आगामी रणनीतीचे वैशिष्ट्य असणार आहे.
मलकापूर येथे म्हणजे कराड दक्षिण मतदारसंघामध्ये लोकसभा प्रभारी अतुल भोसले यांनी काँग्रेसच्या गडाला खिंडार पाडले असून मनोहर शिंदे यांच्या गटातील सहा नगरसेवक भाजपमध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे अर्थातच तेथे भाजपची ताकद वाढली आहे.
कराड उत्तरमध्ये धैर्यशील कदम व विधानसभा निवडणुका प्रमुख मनोज घोरपडे यांच्यामध्ये आमदारकीची चुरस असली तरी दोघांनी एकत्रित केलेल्या कामाचा प्रत्यक्ष परिणाम येथे पाहायला मिळाला. भाजपची ताकद येथे वाढली.
सातारा जावळी विधानसभा मतदारसंघांमध्ये आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अद्याप राजकीय हालचाली प्रत्यक्ष दिसत नसल्या तरी रोजच कार्यकर्त्यांशी असणारा त्यांचा संपर्क आणि मतदारसंघातील विकास कामांसाठी ते देत असलेली गती यामुळे ते लोकांशी संपर्क ठेवून आहेत.
माण विधानसभा मतदारसंघांमध्ये आमदार जयकुमार गोरे यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना मताधिक्य देऊन आपली ताकद दाखवून दिली होती.
अजूनही राष्ट्रवादीला बॅकफूटवर ठेवण्यामध्ये जयकुमार गोरे यशस्वी राहिले आहेत. मात्र, पाणीप्रश्न व इतर समस्या लक्षात घेऊन जयकुमार गोरे यांना विधानसभा निवडणुकांची रणनीती आखावी लागणार आहे. पुणे येथे होणाऱ्या चिंतन बैठकीमध्ये सर्व आमदार प्रचारक बूथ प्रमुख यांना विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम दिला जाणार असल्याची माहिती आहे.