Rahul Gandhi | PM Modi – नीट परिक्षेतील घोटाळ्यावरून कॉंग्रेस पक्षाचा सरकारवर हल्लाबोल सुरूच आहे. आता पक्षाचे नेते राहुल गांधी यांनीही केंद्र सरकारला लक्ष्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विषयावर मौन धारण केले असून भारतीय जनता पार्टीची सरकारे असलेली राज्ये पेपरफुटीची केंद्रे झाली आहेत अशी टीका राहुल यांनी केली आहे.
नीट परिक्षेला बसलेल्या २४ लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ खेळण्यात आला आणि नेहमीप्रमाणे पंतप्रधान मोदी शांत बसले आहेत. बिहार, गुजरात आणि हरियाणा या राज्यांमध्ये या प्रकरणी झालेल्या अटकेच्या कारवाईमुळे हे स्पष्ट झाले आहे की परिक्षेत नियोजनबध्द पध्दतीने संघटीत स्वरूपाचा भ्रष्टाचार झाला आहे आणि भाजपशासित राज्ये पेपर लीक प्रकरणाची केंद्रबिंदू झाली आहेत असे ट्वीट राहुल यांनी केले आहे.
पेपरफुटीच्या विरोधात कठोर कायदा करून युवकांचे भवितव्य सुरक्षित करण्याची गॅरंटी आम्ही आमच्या पक्षाच्या न्यायपत्रात दिली आहे. विरोधी पक्षाची जबाबदारी वठवत आम्ही देशभरातील तरूणांचा आवाज रस्त्यापासून संसदेपर्यंत मांडू आणि सरकारवरवर दबाव आणून कठोर धोरण तयार करण्यासाठी आम्ही कटीबध्द आहोत असे राहुल यांनी म्हटले आहे.
दरम्यान, नीट परिक्षा घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल असून त्यावर आज सुनावणी झाली. या परिक्षेत अगदी सूक्ष्म स्वरूपाचा जरी बेजबाबदारपणा घडला असेल तर त्यात दुरूस्ती केली जावी असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.