Devendra Fadnavis | Lok Sabha Election Result : लोकसभेत महाराष्ट्रात 45 च्या पुढे जागा जिंकणार असल्याचा दावा करणाऱ्या महायुतीला मोठा धक्का बसल्याचे दिसून आले. राज्यात महायुतीला केवळ 17 जागांवर विजय मिळाला असून महाविकास आघाडीने 30 जागांवर मुसंडी मारली आहे. त्यामध्ये सर्वाधिक जागा या काँग्रेसने पटकावल्या आहेत. यात भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांचा राज्यात दारूण पराभव झाला आहे.
दरम्यान, आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन लोकसभेच्या निकालावर भाष्य केलं आहे. यावेळी बोलताना फडणवीसांनी लोकसभा निवडणुकीच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत राज्य मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. इतकंच नाहीतर फडणवीस यांनी असेही म्हटले की, नेता म्हणून महाराष्ट्रातील भाजपच्या पराभवाची सर्व जबाबदारी माझी आहे. पण मी हरणारा नाही, पण ताकदीने मैदानात उतरणार आहे.
परंतु नेतृत्वाला माझी विनंती आहे, मला उपमुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे आणि पक्षात काम करण्याची जबाबदारी द्यावी, असे वक्तव्य करत देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाला विनंती केली आहे. मात्र, आता देवेंद्र फडणवीसांच्या ‘सागर’ बंगल्यावर बैठक सुरु असून फडणवीसांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पण देवेंद्र फडणवीस राजीनामा देण्यावर ठाम असल्याचं देखील बोललं जात आहे.
भाजप नेत्या चित्रा वाघ काय म्हणाल्या….
याबाबत माध्यमांशी बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या की, ‘आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजप नेते चंद्रकांत पाटील आणि इतर महत्त्वाचे नेते देवंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करत आहेत. आमचं संपूर्ण महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांचं म्हणणं प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देवेंद्र फडणवीस यांना सांगत आहे.
आम्हाला विश्वास आहे की, अध्यक्ष जे सांगत आहेत त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी आजचा जो विचार मांडला तो मागे घेतील. आमचे इतर नेते बोलत आहेत. आम्हाला सगळ्यांना आशा आहे की, ते योग्य निर्णय घेतील”, अशी प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया –
एकनाथ शिंदे म्हणाले की, “मी आता त्यांची प्रतिक्रिया ऐकली. निवडणुकांमध्ये हार-जीत होत असते. काही आता जी निवडणूक झाली त्यामध्ये मतदानाची टक्केवारी पाहिली तर मविआला जागा जास्त मिळाल्या असल्या तरी मतांची टक्केवारी सारखी आहे. मुंबईत तर आम्हाला 2 लाख मतं जास्त मिळाली आहे. त्यामुळे आम्ही सर्वांनी मिळून काम केलेलं आहे.
सगळ्यांचं जे काही यश-अपयश आहे, ती आमची सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे, असंच समजतो. आम्ही टीम म्हणून हे काम केलं आहे. राज्यातदेखील खूप चांगलं काम झालेलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मी, उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, आम्हाला पुढे देखील राज्यासाठी एकत्र काम करायचं आहे”, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, ‘मी देवेंद्र फडणवीस यांच्याशी नक्की बोलेन आणि राज्यासाठी एकत्र काम करु. आम्ही एकत्र काम केलं आणि निवडणुकांचे जदे निकाल आले त्याची आमची सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे कुणाच्या एकट्याची जबाबदारी आहे, असं म्हणणारा मी कार्यकर्ता नाही. त्यामुळे मी नक्की त्यांच्याशी बोलेन”, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.