कोलकता – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निकालाचा आधार घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्लाबोल केला. प्रचारावेळी मोदींकडून लोकसभेच्या ४०० हून अधिक जागा जिंकण्याचा दावा केला जात होता. प्रत्यक्षात भाजपला बहुमताइतके संख्याबळही गाठता आले नाही. त्यामुळे नैतिक पराभव मान्य करून मोदींनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
मोदींनी सर्व विश्वासार्हता गमावली आहे. मोदींचा पराभव आणि इंडियाचा विजय झाला आहे. मोदींनी अनेक पक्ष तोडले. आता जनतेने त्यांचे मनोधैर्य तोडले आहे. आता त्यांना सरकार स्थापनेसाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि तेलगू देसम पक्षाला साकडे घालावे लागणार आहे. केंद्रातील सत्तेपासून मोदी दूर राहतील याची निश्चिती करण्याचा प्रयत्न मी करेन. इंडिया आघाडीला सत्ता मिळवून देण्याचा त्यामागील उद्देश असेल, असे ममता पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाल्या.
दिल्लीत बुधवारी इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. त्या बैठकीत भाचे अभिषेक सहभागी होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. त्याचवेळी अद्याप बैठकीविषयी आम्हाला कळवण्यात आले नसल्याची नाराजीही त्यांनी व्यक्त केली. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना अभिनंदन करणारा मेसेज मी पाठवला. मात्र, अद्याप आमच्याशी संपर्क साधण्यात आलेला नाही. बहुधा ते व्यस्त असतील, असे ममता म्हणाल्या.