बारामती, (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील नगर परिषद नगर पंचायत कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बारामती नगर परिषदेच्या वतीने बुधवार (दि.२६) एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती कर्मचारी संघटनेचे वतीने देण्यात आले आहेत. त्याबाबतचे निवेदन मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठासमोर महाराष्ट्र शासनाने सफाई कामगारांना वारसा हक्क लागू करण्याबाबत शासन स्तरावर ठोस भूमिका मांडून लवकरात लवकर वारसा हक्क धोरणाबाबत सरसकट सर्व जाती धर्माच्या कर्मचाऱ्यांना वारसा हक्क लागू करणे,
तथापि उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाने फक्त अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट असणाऱ्या कर्मचाऱ्यांना वारसा हक्क लागू करणेबाबत दाखल याचिकेवर सुनावणी होऊन निर्णय दिला आहे.
परंतु खुल्या व इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांना वारसा हक्काबाबतचा निर्णय प्रलंबित ठेवला आहे. तोही तात्काळ निर्णय व्हावा, महानगरपालिका, नगर परिषद, नगर पंचायत २००५ पासून सेवेत दाखल झालेल्या कर्मचा-यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, १९९३ पूर्वीच्या रोजंदारीवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायम करुन वारसा हक्क लागू करण्याबाबत निर्णय व्हावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
बारामती नगर परिषदेमध्ये रोजंदारीवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायम केले आहे. तथापि त्यांना वारसा हक्क लागू करण्यात आला नाही अशा सर्वांना वारसा हक्क लागु करणेबाबत शासन स्तरावर ठोस निर्णय व्हावा.
राज्य सरकारच्या विविध विभागांमधील सर्व कर्मचा-यांना १०,२०,३०वर्ष नोकरीत झाल्यावर आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यात येतो तथापि महानगर पालिका, नगर परिषद/नगर पंचायत मध्ये कार्यरत असलेल्या कर्मचारी यांना कालबध्द पदोन्नती दिली जात नाही तो निर्णय लवकरात लवकर करण्यात यावा, आदी मागण्यांवर लक्ष वेधणार आहे.
६ ऑगस्टचा निर्वाणीचा अल्टीमेटम
राज्यातील सर्व नगर परिषद, नगरपंचायतीमध्ये गेली १० वर्षापासून प्रलंबित असणारी अनुकंपा प्रकरणे तातडीने मार्गी लावावीत, नगर परिषद नगर पंचायतीमध्ये कायम असणाऱ्या कर्मचा-यांना वैद्यकीय विमा शासन स्तरावर तातडीने कारवाई करावी,
आदी मागण्यांबाबत सरकारला जाग येण्यासाठी व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बारामती नगर परिषद याठिकाणी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे; अन्यथा दि. ६ ऑगस्टपासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे, असे नगर परिषद नगर पंचायत महाराष्ट्र समितीच्या वतीने करण्यात आले आहे.