तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – मावळ तालुक्यात मान्सूनच्या पावसाचे सर्वत्र आगमन झालेले असून या पावसाने खरीप भात पिकांना चांगलाच दिलासा मिळाला आहे.
मावळ तालुका हा खरीप भात पिकाचा प्रामुख तालुका असून या तालुक्यात सुमारे १३ हजार हेक्टर क्षेत्रावर भात पिकाच्या पेरण्या होतात. जूनच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या मान्सूनच्या आणि त्यापूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्याने भात पिकाच्या रोपांच्या पेरण्या केल्या होत्या.
पेरण्या होऊन बरेच दिवस झाले होते. त्यासाठी वळवाच्या पावसाबरोबरच मान्सूनच्या पावसाची अत्यंत गरज होती. मात्र, पावसाने मध्येच दडी मारली होती.
मात्र, रात्रीपासूनच पावसाचे आगमन होताच शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. तालुक्यातील भात पीक रोपाच्या पेरण्या पूर्ण झालेल्या असून काही ठिकाणी भात रोपे चांगली उगवले आहेत. त्यासाठी पाण्याची आवश्यकता होती ती या पावसाने भागवली आहे. असाच पाऊस पडत राहिल्यास लवकरच भात लागवण सुरू होऊ शकते.
यावर्षी १३ हजार हेक्टर भात क्षेत्रापैकी 90 ते 95 टक्के क्षेत्रावर इंद्रायणी जातीच्या भात पिकाच्या पेरण्या झालेले आहे. त्यामुळे तालुक्यात सर्वाधिक क्षेत्रावर इंद्रायणी भात पिकाला शेतकऱ्यांनी चांगली पसंती दिलेली आहे.
शेतकऱ्यांच्या इंद्रायणी भाताला दिवसे दिवस चांगला बाजार भाव आणि ग्राहकाची मागणी येत असल्याने शेतकऱ्यांचा कल इंद्रायणी भात पिकवण्याकडे वाढला आहे.
तालुक्याच्या पूर्वपट्या यावर्षी खरीप सोयाबीन, भुईमूग, चवळी, मुग, उडीद, वाटाणा, तीळ या पिकाच्याही काही ठिकाणी पेरण्या झाले असून काही ठिकाणच्या पेरण्या सुरू आहेत. त्यामुळे शेतकरी आपापल्या कामांमध्ये व्यस्त झालेला आहे.