सासवड : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी सर्व विभागाच्या कामाचे नियोजन पुर्ण होत आले आहे. गेल्या दोन महिन्यापासून सर्वच यंत्रणा काम करीत आहे. यामध्ये स्वच्छता, पिण्याचे पाणी, शौचालयाची व्यवस्था अतिशय चांगल्या प्रकारे झाली असून प्रत्येक ठिकाणी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.अधिकाऱ्यांना जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. असे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी सांगितले.
सासवड (ता पुरंदर) येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी तळावर जिल्हाधिकारी सुहास दिवसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांनी आज पालखीतळाला भेट दिली. यावेळी दिवसे बोलत होते ते पुढे म्हणाले, सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या माध्यमातून रस्त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे व पुलांची कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत. महानगरपालिका, पोलीस विभाग, ग्रामपंचायत उस्फूर्तपणे सहभाग नोंदवित आहे.पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत शोधून काढण्यात आले असून तेथुन पाण्याची व्यवस्था केली आहे.
ड्रोन वापराबाबत अजून कोणत्याही प्रकारचा कायदा आपल्याकडे नाही. मुंबई प्रमाणे कायदा बनवण्याचे काम चालू आहे. ड्रोनची परवानगी घेऊनच ड्रोन उडवली पाहिजेत ड्रोन ब्लॉक करण्यासाठी नवीन यंत्र खरेदी करणार आहोत. मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बेकायदेशीर होर्डिंग काढण्यासाठी पी.एम.आर.डी ला पत्र दिलेले आहे असे दिवसे यांनी सांगितले. यावेळी पुरंदरच्या उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे, तहसीलदार विक्रम रजपूत, उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे, गटविकास अधिकारी अमिता पवार, पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, सासवड नगरपालिकेचे मुख्याधिकारी कैलास चव्हाण, आरोग्य अधिकारी मोहन चव्हाण, संतोष गिरमे, संभाजी जगताप, अजित जगताप उपस्थित होते.