कोयनानगर, (प्रतिनिधी)- कोयना जलविद्युत प्रकल्पबाधित रासाटी, गोकुळ, हेळवाक या गावांना विशेष निधी देण्याची घोषणा पुनर्वसन प्राधिकरणाचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
त्यांच्या निर्णयावर श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी टीका केली आहे. डॉ. पाटणकर यांनी प्राधिकरण बैठकीतील विषय समजून न घेता राजकीय आकसापोटी टीका केली असल्याचा आरोप कोयना धरणग्रस्तांनी केला आहे.
रासाटी, गोकुळ, हेळवाक या गावांना गेली 70 वर्ष कोणताही पुनर्वसन निधी मिळाला नव्हता. तो भूकंप पुनर्वसन निधीमधून विशेष बाब म्हणून देण्याची घोषणा पवार यांनी केली. पुनर्वसन प्राधिकरणाचे सदस्य राहिलेल्या डॉ. भारत पाटणकर यांनी या तीन गावांसाठी कधीही, कोणतीही भूमिका घेतली नव्हती.
पाटण तालुक्यातील सामान्य धरणग्रस्तांनी पहिल्यांदा हा मुद्दा चर्चेला आणला. त्यानंतर डॉ. पाटणकर यांनी नाईलाजाने कार्यकर्त्यांचे मन राखण्यासाठी विषय पत्रिकेचा रकाना भरण्याचा विषय ठेवला, असे म्हणावे लागले. इतकी वर्ष कोयनेचा लढा करणारे डॉ. भारत पाटणकर यांना या तीन गावांबद्दल काहीच माहिती न्हवती की जाणीवपूर्वक त्यांनी या विषयाकडे दुर्लक्ष केले होते.
गेल्या सात दशकांपासून कोयना धरणग्रस्तांचे प्रश्न प्रलंबित आहेत. अलीकडच्या काळात धरणग्रस्तांनी संघटित होऊन दिलेल्या लढ्यामुळे हे प्रश्न सुटण्याच्या मार्गावर असताना डॉ. भारत पाटणकर यांची आडमुठी व सरकारविरोधी भूमिका घेतल्याने हे प्रश्न चिघळले आहेत.
यामुळे कोयना धरणग्रस्तांची फरफट होत असल्याचे उघड झाले आहे. रासाटी, शिवन्देश्वर, गोकुळ या गावांना पहिल्यांदा शासनाकडून न्याय मिळत आहे. श्रमिक मुक्ती दलालाच मुक्ती द्यावी, अशी प्रतिक्रिया रासाटी, शिवन्देश्वर व गोकुळ या गावांतील कोयना धरणग्रस्तांनी व्यक्त केली आहे.