नगर, (प्रतिनिधी) – नगर शहरासह उपनगरांमध्ये विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक वीजपुरवठा खंडीत केला जात असून, तासनतास तो पूर्ववत सुरू केला जात नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. भिंगार उपनगरात पावसाची रिमझिम झाल्याने तासनतास वीज गुल होते. दि. 4 रोजी रात्री 9 पासून गेलेली वीज दि.5 रोजी सकाळी 12 वाजता आली.
दिवसभरात 4 ते 5 वेळा वीज जाते. भिंगारमध्ये दररोज किमान एक ते दोन तास वीजपुरवठा खंडित होत आहे. अतिरिक्त लोड वाढत असल्याने वीजपुरवठा खंडीत होत असल्याचा दावा महावितरण करीत आहे. तसेच पाऊस पडल्याने तारा तुटल्याचा बहाणा देखील देत आहे. त्यामुळे रिमझिम पावसाचा डाव मांडून त्याआडून महावितरण विजेच्या लपंडावाचा खेळ खेळत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
पावसाळ्याचे दिवस असताना अचानक वीजपुरवठा खंडीत केला जात असल्याने बाजारपेठेतील व्यावसायिक, व्यापारी, ग्राहकांसह शहरातील नागरिक त्रस्त आहेत. वीज का गेली? याबाबत महावितरणच्या कार्यालयात अधिकार्यांच्या मोबाईलवर फोन केल्यानंतर कोणताही प्रतिसाद मिळत नाही.
फोन बंद किंवा लाईन व्यस्त आहे, सांगतात. याबाबत महावितरणच्या वरिष्ठ अधिकार्यांनी तात्काळ दखल घेत शहरातील वीजपुरवठा सुरळीत सुरू ठेवावा, अशी मागणी होत आहे.
मागील एक महिन्यापासून त्या लाईनची दररोज सकाळी वीज गायब होणे किंवा विद्युत पुरवठा कमी दाबाने होणे, अशा समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.
दररोज हा प्रकार सुरु असून, या भागातील सबंधित कर्मचारी वर्गाला सांगून देखील या प्रश्नाची सोडवणूक करण्यात आलेली नाही. पावसाची रिमझिम झाली की वीज घालवितात. एकप्रकारे भारनियमनाप्रमाणे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.