मुंबई : लोकसभा निवडणुकीचे निकाल लागून एक महिना झाला तरी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधला वाद काही कमी व्हायचं नाव घेईना. यादरम्यान आता भाजपचे आमदार सुरेश धस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेतल्याने आमचं वाटोळं झालं अशी कबुली दिली. तसेच अमोल मिटकरी, सुरज चव्हाण यांची भाजप-आरएसएसवर बोलण्याची लायकी नाही अशी टीकादेखील त्यांनी यावेळी केली.
नेमके काय म्हणाले सुरेश धस?
‘आमच्या युतीत तिसरा भिडू आला, हे जनतेला पटलं नाही. लोक आमच्या विरोधात का गेले? लोकांच्या मनात राग का निर्माण झाला? याचं कारणच हे आहे. राष्ट्रवादीला तुम्ही का घेतलं? त्यामुळे आमचं वाटोळं झालेलं आहे. आम्ही आतापर्यंत शांत होतो, आम्ही हसत हसत उत्तर दिलं होतं. सुरज चव्हाण आणि अमोल मिटकरी भाजप आणि आरएसएसवर बोलत असतील तर शांत राहणं बरोबर नाही. आरएसएस आणि भाजपवर बोलण्याइतकी त्यांची लायकी नाही’, असं सुरेश धस म्हणाले.
सुरेश धस यांनी दिला इशारा
‘राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्ष बोलण्यापुरती नोटीस वगैरे देत आहेत. नाटक करतायत आणि हळूच त्यांना बोलायला पाठवत आहेत. तुम्हाला आवडत नसेल तर तुमचे तुम्ही सेपरेट व्हा, आमचं आम्ही सेपरेट लढू. शिवसेना आणि भाजप दोघंच एकत्र लढतील’, असा इशारादेखील सुरेश धस यांनी यावेळी दिला.